yuva MAharashtra मिरजेतील अपहरण प्रकरणाचा सुखद शेवट; हरवलेले तीन दिवसांचे बाळ आईच्या कुशीत विसावले!

मिरजेतील अपहरण प्रकरणाचा सुखद शेवट; हरवलेले तीन दिवसांचे बाळ आईच्या कुशीत विसावले!


| सांगली समाचार वृत्त |
मिरज - दि. ६ मे २०२५

मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून चोरी गेलेले अवघे ७२ तासांचे बाळ अखेर ४८ तासांनंतर सुखरूपरीत्या आईच्या मिठीत परतले. सोमवारी रात्री सिध्देवाडी (ता. तासगाव) येथे पोलिसांनी संशयित महिलेला बाळासह ताब्यात घेतले.

शनिवार, ३ मे रोजी सकाळी १२ वाजेच्या सुमारास कोळे (ता. सांगोला) येथील कविता अलदार या महिलेच्या प्रसूतीनंतर, वार्ड क्र. ६४ मधून तिचे तीन दिवसांचे बाळ अज्ञात महिलेने पळवले होते. तिने औषध आणण्याचे कारण देत बाळासह रुग्णालयातून पलायन केले. बाळाला प्लास्टिकच्या पिशवीत घेऊन जात असल्याचे रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेजमधून दिसून आले.

घटनेनंतर महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी दोन्ही – बाळ व आरोपी – यांचा शोध युद्धपातळीवर सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण आणि रुग्णालयातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी सारा सायबा साठे (वय २४, रा. सावळज, ता. तासगाव) हिला संशयावरून ताब्यात घेतले आणि तिच्याकडून बाळाची सुटका केली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या उपस्थितीत बाळ पुन्हा आईकडे सुपूर्द करण्यात आले.


दरम्यान, या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने वरिष्ठ प्राध्यापकांची चौकशी समिती गठीत केली असून, समितीला लवकरात लवकर अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या गेल्या आहेत, अशी माहिती अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांनी दिली.