| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ६ मे २०२५
काँग्रेस ने आजवर जातनिहाय जनगणनेला विरोधच केला आहे. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आजवर योग्य पद्धतीने जातनिहाय जनगणना कधीच झाली नाही. म्हणून असा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी एकाप्रसिध्दी पत्रकाराबाबत अभिनंदन केले आहे.
२०१० मध्ये त्यावेळचे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी जातनिहाय जनगणने बाबत केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत विचार करू असे आश्वासन लोकसभेत दिले होते. त्या नंतर जात निहाय जनगणनेसाठी मंत्रिमंडळ गटाची स्थापनाही करण्यात आली होती. मात्र या गटातील तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री पी. चिदम्बरम यांनी २०११ मध्ये होणाऱ्या जनगणनेत जात निहाय जनगणना करण्यास विरोध केला होता. जात निहाय जनगणना स्वतंत्रपणे केली जाईल, असे चिदंबरम यांनी जाहीर केले होते. प्रत्यक्षात मात्र मनमोहन सिंग यांच्या काँग्रेस सरकारने जात निहाय जनगणना प्रत्यक्षात कधीच केली नाही, असा आरोप प्रकाश ढंग यांनी या प्रसिद्धी पत्रकामध्ये केला आहे.
या प्रसिद्धी पत्रकात दंग यांनी पुढे म्हटले आहे की, काँग्रेस सरकारने सामाजिक-आर्थिक आणि जात गणना (SECC) केली. त्यासाठी ४८९३. ६० कोटी इतका खर्च केला. मात्र कोणत्या जातीचे लोकसंख्येतील प्रमाण किती आहे याची आकडेवारी जाहीरच केली नाही. या पाहणीच्या अहवालात विविध प्रकारच्या ८. १९ कोटी एवढ्या प्रचंड चुका होत्या. याचा अर्थ काँग्रेस सरकारने अनिच्छेने हि पाहणी अक्षरशः उरकली होती. मात्र काँग्रेस आणि काँग्रेसच्या इंडी आघाडीतील मित्र पक्षांनी या मुद्याचा वापर फक्त राजकीय स्वार्थासाठी केला.
संविधानात जन गणना हा विषय केंद्रीय सूचित समाविष्ट करण्यात आला आहे. याचा अर्थ जन गणना या विषयाची जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे. काही राज्य सरकारांनी जातीची पाहणी (सर्व्हे) केली आहे. ही पाहणी काही सरकारांनी योग्य पद्धतीने केली आहे, तर काही राज्य सरकारांनी राजकीय हेतूने अपारदर्शक पद्धतीने ही पाहणी केली. असे सव्हें समाजाची दिशाभूल करीत आहेत, जननेत गैरसमज निर्माण करीत आहेत. मोदी सरकारने शाखीय पद्धतीने ही जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. यातून समाजात तणाव निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्याची मोदी सरकारची भूमिका आहे. याच पद्धतीने मोदी सरकारने 2019 मध्ये आर्थिक मागासले पण लक्षात घेऊन आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता, असे प्रकाश ढंग यांनी या प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.
भारतीय जनता पार्टीने आजवर जातनिहाय जनगणनेला कधीच विरोध केला नाही. केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी जात निहाय जनगणनेला भाजपाचा पाठिंबा आहे हे अनेकदा स्पष्ट केले आहे. जनगणने बरोबरच जातनिहाय गणना व्हावी अशी भाजपाची भूमिका आहे. २०२१ मध्ये सार्वत्रिक जन गणना कोरोना मुळे होऊ शकली नव्हती. आता जन गणना होईल त्याच्या बरोबरच जात निहाय गणना होणार आहे. बिहार मध्ये जात निहाय पाहणी करण्यास भाजपाने पाठिंबा दिला होता राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस ने आपली सत्ता असलेल्या राज्यात कधीच अशी पाहणी केली नाही, असे शेवटी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग यांनी या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.