yuva MAharashtra वालचंदच्या जयला दीड कोटींची ऑफर; अमेरिकेतील 'रुबरिक' कंपनीकडून ऐतिहासिक पॅकेज

वालचंदच्या जयला दीड कोटींची ऑफर; अमेरिकेतील 'रुबरिक' कंपनीकडून ऐतिहासिक पॅकेज


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ३० मे २०२५

सांगली – येथील वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालयातील संगणक शाखेचा विद्यार्थी जय शिरगुप्पे याला अमेरिकेतील बहुराष्ट्रीय 'रुबरिक' कंपनीने तब्बल ₹1.5 कोटी वार्षिक वेतनाचे पॅकेज ऑफर केले आहे. डेटा सुरक्षा क्षेत्रात कार्यरत असलेल्या या कंपनीकडून मिळालेलं हे महाविद्यालयाच्या इतिहासातील आजवरचं सर्वात मोठं पॅकेज ठरलं आहे.

जयचा हा यशस्वी प्रवास त्याच्या मेहनतीसोबतच महाविद्यालयातील दर्जेदार शिक्षणाचं उत्तम उदाहरण मानलं जात आहे. शिक्षण घेत असतानाच रुबरिक कंपनीने त्याला दरमहा ₹1.75 हजार शिष्यवृत्ती दिली होती. सध्या तो डेटा सिक्युरिटी विषयात संशोधन करत आहे. जयचं प्राथमिक शिक्षण सांगलीत मराठी माध्यमातून, तर पुढील शिक्षण पुणे व पन्हाळा येथून झाले. त्याचे वडील नितीन शिरगुप्पे केएसबी पंप्समध्ये अभियंता आहेत, तर आई सुनीता या गृहिणी आहेत.

८४% विद्यार्थ्यांना ₹१० लाखांहून अधिक पॅकेज

महाविद्यालयाच्या २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात ११६ नामवंत कंपन्यांनी कॅम्पस मुलाखती घेतल्या, ज्यात गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, क्रेड, एलअँडटी, रिलायन्स, टाटा ग्रुप, सीमेन्स यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता. एकूण ४१२ विद्यार्थ्यांपैकी ३५१ जणांना नोकऱ्या मिळाल्या, आणि यातील ८४ टक्के विद्यार्थ्यांना सरासरी ₹१० लाखांपेक्षा अधिक वार्षिक पॅकेज मिळाले आहे.


टॉप पॅकेजधारक विद्यार्थी आणि कंपन्या

गुगल – यशस्वी पाटील, अंकिता डोंगरे, साक्षी धामापूरकर (₹५४ लाख)

मायक्रोसॉफ्ट – वैष्णवी लोखंडे (₹५२.५ लाख)

क्रेड – आराध्य पित्तलवार, प्रज्वल शहा (₹५२ लाख)

ॲडोबी – कृणाल गिराडकर (₹४८ लाख)

ॲमेझॉन – रिद्धी शहा, हरिश्री वैद्य, इतर (₹४२ लाख)

वेफेअर, क्वाईन स्वीच, डेल, डॉईश बँक, युबीएस, टॉम टॉम, ध्रुवा सॉफ्टवेअर अशा विविध कंपन्यांमधूनही अनेक विद्यार्थ्यांना उत्कृष्ट संधी मिळाल्या. याशिवाय काही विद्यार्थ्यांनी केंद्र व राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये यश मिळवले आहे.

देशाच्या प्रगतीत 'वालचंद'चा मोलाचा वाटा

स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेलं वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय देशाच्या औद्योगिक विकासात सातत्याने योगदान देत आहे. यंदा संस्थेच्या स्वायत्ततेनंतरचा १५ वा प्रारंभ दिन साजरा होत असून, यानिमित्त विविध यशोगाथा समोर आल्या आहेत. महाविद्यालयाचे प्रभारी संचालक डॉ. उदय दबडे, तसेच व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद व अन्य सदस्य यांचे मार्गदर्शन आणि प्रोत्साहन महत्त्वपूर्ण ठरले आहे.

कार्पोरेट रिलेशन्स विभागाचे अधिष्ठाता प्रा. संजय धायगुडे म्हणाले की, जगभरातील आघाडीच्या कंपन्यांनी ‘वालचंद’ला दिलेली पसंती ही इथल्या गुणवत्तेची पोचपावती आहे. विविध क्षेत्रांतील कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस मुलाखतींतून अनेक विद्यार्थ्यांनी ₹४० लाखांपेक्षा अधिक (११ विद्यार्थी) व ₹१५ लाखांपेक्षा अधिक (३९ विद्यार्थी) पॅकेज मिळवले आहे.