| सांगली समाचार वृत्त |
गांधीनगर - दि. २८ मे २०२५
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा एकदा पाकिस्तानच्या दहशतवादी धोरणावर कठोर शब्दांत टीका करत भारताची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, पाकिस्तानला माहिती आहे की, उघड युद्धात भारताला पराभूत करणे शक्य नाही. म्हणूनच ते सरळ युद्ध न करता दहशतवादी मार्गाने भारताला त्रस्त करत राहतात.
गुजरात दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गांधीनगरमध्ये बोलताना पंतप्रधान मोदींनी इतिहासाच्या घटनांचा संदर्भ देत सांगितले की, भारताच्या फाळणीनंतर लगेचच काश्मीरमध्ये मुजाहिदीनचा पहिला दहशतवादी हल्ला झाला. "जर त्या रात्रीच ठोस निर्णय घेतला असता, तर आज ७५ वर्षांचे हे जखम देणारे सत्य टळले असते", असे ते म्हणाले.
मोदींनी असेही नमूद केले की, शरीर जरी मजबूत असले तरी छोटाही काटा सतत वेदना देतो, त्यामुळे अशा काट्यांना काढणे आवश्यक आहे. ते म्हणाले की, "सरदार पटेल यांनी पीओके पुन्हा भारतात येईपर्यंत सैन्य मागे न घ्यावे असे सुचवले होते, पण त्यांचा सल्ला मानला गेला नाही. त्यामुळे दहशतवाद्यांच्या हिंसेला सुरुवात झाली."
"ऑपरेशन सिंदूर"ची आठवण
मोदींनी 'ऑपरेशन सिंदूर'चा उल्लेख करत सांगितले की, एका रात्रीत २२ मिनिटांत ९ दहशतवादी अड्ड्यांचा सफाया करण्यात आला आणि हे सर्व प्रत्यक्ष कॅमेऱ्यासमोर करण्यात आले. "कोणी पुरावा मागू नये म्हणून आम्ही आधीच सर्व व्यवस्था केली होती," असे त्यांनी स्पष्ट केले.
"६ मेनंतर जे दहशतवादी मारले गेले, त्यांच्या शवपेट्यांवर पाकिस्तानचा झेंडा लावला गेला, आणि त्यांना पाकिस्तानी सैन्याकडून मानवंदना देण्यात आली. यावरून हे एक प्रॉक्सी वॉर नसून, जाणूनबुजून आखलेले युद्धनीतीचे उदाहरण आहे," असे त्यांनी ठामपणे सांगितले.
देशभक्तीचा उत्साह सर्वत्र दिसतो
गुजरात दौऱ्यादरम्यान विविध जिल्ह्यांत ५,५३६ कोटींच्या प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी गेल्या दोन दिवसांपासून गुजरातच्या विविध भागांत फिरतोय, आणि जिथे जिथे गेलो तिथे तिथे देशभक्तीची प्रचंड लाट अनुभवली. फडफडणारा तिरंगा आणि देशासाठी झपाटलेले नागरिक हे दृश्य फक्त गुजरातपुरते मर्यादित नाही, तर ते संपूर्ण भारताचे प्रतिबिंब आहे."