| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २८ मे २०२५
महाराष्ट्रात मान्सूनने हजेरी लावल्यानंतर संभाव्य पूरस्थितीचा विचार करता जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी आज आयर्विन पूलाजवळील कृष्णा नदी घाट, हरिपूर पूल आणि मिरजमधील कृष्णा घाट या संभाव्य पूरप्रभावित ठिकाणांना भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक उपाययोजना व प्रशासनाची सज्जता याचा सविस्तर आढावा घेतला तसेच स्थानिक नागरिकांशी थेट संवाद साधला.
या पाहणीवेळी विविध शासकीय अधिकारी उपस्थित होते – जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता सी. एच. पाटोळे, मिरज उपविभागीय अधिकारी उत्तम दिघे, महानगरपालिकेच्या उपायुक्त स्मृती पाटील, कार्यकारी अभियंता ज्योती देवकर, तहसीलदार अपर्णा मोरे-धुमाळ, अप्पर तहसीलदार अश्विनी बरुटे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रफिक नदाफ, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मिलिंद पोरे, आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र ताटे तसेच हरिपूरचे सरपंच राजश्री तांबवेकर व अरविंद तांबवेकर यांचीही उपस्थिती होती.
जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी इशारा पातळी, धोका पातळी, नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर, निवास व भोजन व्यवस्था, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, जनावरांचे व्यवस्थापन, पूरपश्चात शेतीचा आढावा, औषध साठा आणि आरोग्य व्यवस्थापन यांसारख्या अनेक बाबींचा प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन तपासणी केली.
यावेळी त्यांनी २०१९ सालच्या पूरस्थितीत प्रत्यक्ष सहभाग घेतलेल्या नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या अनुभवातून मार्गदर्शन घेतले.
जिल्हाधिकारी काकडे यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद, महानगरपालिका आणि पाटबंधारे विभाग हे सर्व एकत्रितपणे संभाव्य पूरस्थितीला तोंड देण्यासाठी सज्ज आहेत. गाव, शहर, तालुका आणि वॉर्ड स्तरावर आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात आले आहेत.
त्यांनी यंत्रणांना निर्देश दिले की, विभागांमध्ये समन्वय साधावा, धोक्याचा इशारा देणारे गट स्थापन करावेत, त्यांना योग्य प्रशिक्षण द्यावे. स्थानिक नागरिकांना प्रथमोपचार गटात सहभागी करून त्यांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे. स्वयंसेवी संस्था व ‘आपत्ती मित्र’ यांचे संपर्क तपशील अद्ययावत ठेवावेत. तसेच, शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करून प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये आवश्यक औषध साठा ठेवावा, असे त्यांनी स्पष्ट केले.