yuva MAharashtra महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला गती; ६ मे रोजी निर्णायक सुनावणीची शक्यता !

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला गती; ६ मे रोजी निर्णायक सुनावणीची शक्यता !


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ मे २०२५

गेल्या तीन वर्षांपासून रखडलेल्या महाराष्ट्रातील महानगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकांना अखेर चालना मिळण्याची चिन्हं दिसत आहेत. यामध्ये मुंबई महानगरपालिकेसह अन्य महापालिकांचाही समावेश आहे. या निवडणुकांचा निर्णय ६ मे २०२५ रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर अवलंबून आहे. त्यामुळे प्रशासन पातळीवर निवडणूक प्रक्रियेसाठी हालचाली सुरू झाल्या असून, राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे.

निवडणूक यंत्रणेची तयारी सुरू

लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांनंतर आता स्थानिक निवडणुकांवर साऱ्यांचे लक्ष केंद्रीत झाले आहे. विशेषतः मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनाने पावलं उचलली असून, मतदार यादींचे अद्ययावतीकरण सुरु झाले आहे. २ मे २०२५ रोजी काही सरकारी कर्मचाऱ्यांना बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) म्हणून नियुक्त केल्याची माहिती समोर आली आहे.

प्रत्येक BLO ला दोन मतदान केंद्रांची जबाबदारी दिली जाते. ते नव्या मतदारांची नोंदणी, मृत किंवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे, व चुकीच्या नोंदी दुरुस्त करणे अशा कामांत गुंतलेले असतात. BLO ची नेमणूक ही निवडणूक प्रक्रियेतील प्राथमिक पण अत्यंत महत्त्वाची पायरी मानली जाते.


लांबलेल्या निवडणुका आणि कायदेशीर अडथळे

मुंबईसह अनेक महापालिकांचे कार्यकाल २०२२ मध्येच संपले होते. मात्र, कोरोना महामारी, प्रभाग रचना, ओबीसी आरक्षण आणि संबंधित कायदेशीर वाद यांमुळे निवडणुका वारंवार पुढे ढकलल्या गेल्या. परिणामी, महापालिकांमध्ये प्रशासकांकडून कारभार चालवला जात आहे. यामुळे स्थानिक विकासकामे थांबलेली आहेत.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी निर्णायक ठरणार?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि संबंधित प्रभाग रचनेबाबत दाखल अनेक याचिकांवर सुनावणी ६ मे २०२५ रोजी होणार आहे. याआधी २२ जानेवारी २०२५ रोजी सुनावणी झाली होती, पण त्यानंतर चार वेळा तारीख पुढे ढकलण्यात आली. यंदा मात्र न्यायालय निवडणुकीच्या अडचणींवर स्पष्ट निर्णय देण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे निवडणुकीच्या तारखांची घोषणा होऊ शकते.

राजकीय पक्षांमध्ये चढाओढ

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही सर्वात प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे शिवसेना (उद्धव गट), शिवसेना (शिंदे गट), भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार व अजित पवार गट) या प्रमुख पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. शिंदे गटाने "मिशन महापालिका" मोहीम राबवली असून, नव्या युती आणि पक्षांतरामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.

मतदार यादी अद्ययावत करण्यावर भर

मुंबईसारख्या महानगरात मतदारांची संख्या प्रचंड आहे. सुमारे ७५ लाख मतदारांची नोंद असून, याद्यांचे अद्ययावतिकरण हे महत्त्वाचे आव्हान आहे. BLO मार्फत मोठ्या प्रमाणावर काम सुरू असून, प्रशासन कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण व सुविधा पुरवत आहे.

निवडणुका जून-जुलैमध्ये ?

जर ६ मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने प्रभाग रचना व आरक्षणाच्या मुद्द्यांवर अंतिम निर्णय दिला, तर जून किंवा जुलै २०२५ मध्ये निवडणुका घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या मुंबईत २२७ प्रभाग आहेत. निवडणुकीसाठी नव्याने प्रभाग रचना होण्याची दाट शक्यता आहे.