yuva MAharashtra पाकिस्तान अणुबॉम्ब वापरू शकतो का ? ‘उरी’ सर्जिकल स्ट्राईकचे वीर लेफ्टनंट निंभोरकर यांचे स्पष्ट मत !

पाकिस्तान अणुबॉम्ब वापरू शकतो का ? ‘उरी’ सर्जिकल स्ट्राईकचे वीर लेफ्टनंट निंभोरकर यांचे स्पष्ट मत !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ मे २०२५

जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभर संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला आता कडक उत्तर देण्याची वेळ आली आहे, अशी भावना सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. केंद्र सरकारनेही या हल्ल्यानंतर कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणाव सध्या गंभीर टप्प्यावर पोहोचला असून, निष्पाप नागरिकांच्या मृत्यूनंतर भारताने लष्करी कारवाईचे संकेत दिले आहेत. या पार्श्वभूमीवर ‘उरी’ सर्जिकल स्ट्राईकमध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेले मराठमोळे लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंभोरकर यांच्या मताकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

एका मराठी माध्यमाशी बोलताना लेफ्टनंट निंभोरकर यांनी पाकिस्तानच्या या कृत्याचा तीव्र निषेध केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, अशा परिस्थितीत भारताने निर्णायक पावले उचलली पाहिजेत. पाकिस्तान प्रायोजित दहशतवादाविरुद्ध कठोर कारवाई करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

पाकिस्तान अणुहल्ला करू शकतो का ? 

मुलाखतीदरम्यान, जेव्हा त्यांना विचारण्यात आले की पाकिस्तान अणुबॉम्ब टाकण्याची धमकी वारंवार देतो, त्यामागे काय धोरण आहे आणि तो खरोखर असा हल्ला करू शकतो का – यावर उत्तर देताना निंभोरकर म्हणाले की, ही पाकिस्तानची जुनी रणनीती आहे. त्यांच्या मते, पाकिस्तानने एक ‘रेड लाईन’ आखलेली आहे. त्यांचा एक विश्लेषक खान युसुफिया याने हे धोरण मांडले होते – की जर कोणतेही सैन्य पाकिस्तानच्या सीमेकडे येऊ लागले, तर ते अणुहल्ला करतील, अशी धमकी दिली जाते.

पण ही फक्त पाकिस्तानची एक मनोवैज्ञानिक रणनीती आहे. प्रत्यक्षात ते अणुबॉम्बचा वापर करणार नाहीत, असा विश्वास निंभोरकर यांनी व्यक्त केला. त्यांनी परवेझ मुशर्रफ यांच्या काळातील अणुहल्ल्याच्या धमकीचाही उल्लेख केला.


पाकिस्तानने जर अणुहल्ला केला, तर...?

निंभोरकर पुढे म्हणाले की, जर पाकिस्तानने खरोखर अणुहल्ला करण्याचे धाडस केले, तर भारताकडेही तितकीच ताकद आहे. भारताकडून होणाऱ्या प्रत्युत्तरात पाकिस्तानला फार मोठी किंमत मोजावी लागेल. इतकी की, पाकिस्तानचा भूगोलच बदलू शकतो आणि त्याचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला.