| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ५ मे २०२५
विधानसभा निवडणुकीत महायुतीने जोरदार विजय मिळवून विरोधकांचा जोरदार पराभव केला असला, तरी आता महायुतीच्या अंतर्गत सूर चुकताना दिसत आहेत. सत्तेत असूनही महायुतीत अंतर्गत विसंवाद वाढल्याचे संकेत मिळत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विरोधात शिंदे गट उघडपणे नाराजी व्यक्त करत आहे, त्यामुळे महायुतीत पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची कुजबुज रंगत आहे.
जळगावमध्ये राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे दोन माजी मंत्री – गुलाबराव देवकर आणि सतीश पाटील – यांनी अजित पवार यांच्या गटात प्रवेश केला. यावरून शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी नाराजी व्यक्त केली असून, त्यांनी थेट युतीच्या तत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. त्यांनी अजित पवार गटावर शिंदे गटाची अडचण वाढवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.
याशिवाय समाजकल्याण मंत्री संजय शिरसाठ यांनी त्यांच्या खात्याचा निधी परस्पर वळवण्यात आल्याबद्दल तक्रार करत अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. त्याचबरोबर, एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना पगाराच्या वाटपात अडचणी आल्यामुळेही शिंदे गटाच्या नाराजीला कारणीभूत ठरत आहे. परिवहन विभाग शिंदे गटाकडे असतानाही निधी दिला गेला नसल्यामुळे कर्मचाऱ्यांत नाराजीचा सूर उमटला आहे.
दरम्यान, अजित पवार गटाने आयोजित केलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्कार सोहळ्यास एकनाथ शिंदे अनुपस्थित राहिल्याने चर्चेला उधाण आले आहे. शिंदे यांनी पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याचे कारण दिले, मात्र त्यांच्या गैरहजेरीने राजकीय वर्तुळात वेगळेच अर्थ काढले जात आहेत.
या सर्व घडामोडी पाहता, महायुतीमध्ये आतून काहीतरी खदखदत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. महाविकास आघाडीच्या काळात जे प्रश्न होते, तेच वाद आता महायुतीतही दिसू लागले आहेत.