| सांगली समाचार वृत्त |
धर्मशाला - दि. ९ मे २०२५
आयपीएल 2025 मधील 58वा सामना धक्कादायक घटनांमुळे थांबवण्यात आला आहे. पंजाब किंग्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सुरू असलेला सामना अचानक थांबवण्यात आला असून, यामागील कारण सुरुवातीला लाईट्समधील तांत्रिक बिघाड असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, पुढील माहितीनुसार, हे पाऊल सीमेवरील वाढत्या तणावामुळे सुरक्षेच्या दृष्टीने उचलण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
धर्मशाला मैदान हे सीमेपासून केवळ 150 किमी अंतरावर आहे. सध्या सीमेलगतच्या परिसरात सतत ब्लॅकआऊट होत असून, पाकिस्तानकडून येणाऱ्या संभाव्य हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशासन अधिक सतर्क झाले आहे. याच अनुषंगाने सामना अर्धवट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
सामना सुरू असताना पंजाबने 10.1 षटकांमध्ये 1 गड्याच्या मोबदल्यात 122 धावा केल्या होत्या. त्याचवेळी संपूर्ण मैदानात अंधार पसरला आणि खेळ थांबवण्यात आला. सुरुवातीला हा प्रकार केवळ लाईट बिघाड असल्याचे भासवण्यात आला, पण लगेचच प्रेक्षकांना मैदान रिकामे करण्याचे आदेश देण्यात आले.
ईएसपीएन क्रिकइन्फोने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआय आणि सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तरीत्या स्टेडियम रिकामे करण्याचा निर्णय घेतला. फ्लडलाइट्स रात्री 9:29 वाजता बंद पडल्या होत्या आणि त्यानंतर लगेचच मैदानात असलेले खेळाडू आणि प्रेक्षक बाहेर पडू लागले.
सध्याच्या घडामोडींनुसार, भारताने पाकिस्तानकडून होणाऱ्या सर्व हल्ल्यांना एअर डिफेन्स सिस्टिमच्या मदतीने यशस्वीरित्या परतवले आहे. तथापि, सुरक्षेचा धोका लक्षात घेता, सामना रद्द करण्यात आला आहे. बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत घोषणाची प्रतीक्षा आहे.