| सांगली समाचार वृत्त |
जळगाव - दि. ९ मे २०२५
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे भारतीय लष्कराने आपल्या जवानांना तातडीने मुख्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अशाच एका आदेशानंतर पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील सैनिक मनोज ज्ञानेश्वर पाटील यांनी नुकत्याच पार पडलेल्या लग्नाचे सोहळे मागे टाकत सीमेवर जाण्याचा निर्णय घेतला.
मनोज पाटील हे २०१७ पासून भारतीय लष्करात कार्यरत आहेत. नुकतेच, ५ मे रोजी त्यांचा विवाह नाचणखेडे येथील यामिनी हिच्याशी पार पडला. मात्र युद्धजन्य स्थितीमुळे फक्त तीन दिवसांतच त्यांना पुन्हा सेवेत रुजू होण्यास सांगण्यात आले. देशसेवेच्या आवाहनाला तात्काळ प्रतिसाद देत त्यांनी ८ मे रोजी सीमेवर रवाना होण्याचा निर्णय घेतला.
हळदीचा रंग अंगावर असतानाच सीमेवर निघालेल्या मनोजच्या या निर्णयाने त्याच्या आई-वडिलांचे डोळे पाणावले, तर नवविवाहित पत्नीही भावना अनावर होऊन भावूक झाली. कुटुंबासाठी हा क्षण अत्यंत कठीण असला तरी मुलाने देशासाठी घेतलेल्या या निर्णयाचा त्यांना अभिमान वाटतो, असे मनोजचे वडील म्हणाले.
“देशापेक्षा मोठे काही नाही. त्याचे रक्षण करणे हेच खरे कर्तव्य,” असे मनोजच्या पत्नीने नम्रतेने सांगितले. लग्नाच्या सुंदर स्वप्नांना क्षणभर थांबवून देशासाठी पुढे सरसावलेला हा जवान समाजासाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरतो.