| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २२ मे २०२५
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. अवकाळी पावसाने राज्याच्या विविध भागांना जोरदार तडाखा दिला असून, वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाटामुळे अनेक ठिकाणी नुकसानाची नोंद झाली आहे. यामुळे शेती क्षेत्रावर मोठा परिणाम झाला असून काही ठिकाणी अपघातांचीही माहिती समोर आली आहे.
मुंबईपासून मराठवाडा आणि विदर्भापर्यंत अनेक भागांत जोरदार पावसाचा अनुभव नागरिक घेत आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुन्हा एकदा मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. हवामान तज्ज्ञ जालिंदर साबळे यांनी यासंदर्भात सविस्तर माहिती दिली आहे.
राज्यात सध्या प्री-मान्सून पावसाची सुरुवात झाली असून, जोरदार वाऱ्यांबरोबरच विजांचा कडकडाटदेखील अनुभवास येत आहे. काही भागांमध्ये वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किलोमीटरपर्यंत पोहोचत असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. येत्या तीन दिवसांत दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या जिल्ह्यांना रेड अलर्ट
सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता असून, हवामान विभागाने येथे ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसत असून, शेतीसाठी ही परिस्थिती चिंताजनक बनली आहे.
जालना जिल्ह्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
जालना जिल्ह्यातील बदनापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून सतत अवकाळी पावसाचा मारा सुरू आहे. पीर पिंपळगाव, सिंधी पिंपळगाव, तुपेवाडी आणि बावणे पांगरी या गावांमध्ये जोरदार वाऱ्यांसह आलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. फळबागा आणि शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती मिळाली आहे.
विदर्भातही पावसाचे धडकते स्वरूप
विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात आज मुसळधार पाऊस कोसळला. अहेरी, भामरागड, एटापल्ली आणि सिरोंचा परिसरात जोरदार सरी कोसळल्याने नागरिक आणि शेतकरी धास्तावले आहेत.