yuva MAharashtra आयटी हबसाठी जागा उपलब्ध करा, पृथ्वीराज पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !

आयटी हबसाठी जागा उपलब्ध करा, पृथ्वीराज पाटील यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ एप्रिल २०२५

आयटी क्षेत्राला दक्षिण महाराष्ट्रात प्रवेश करायचा आहे. ही सांगलीसाठी संधी आहे. जिल्हा प्रशासनाने तात्काळ यादृष्टीने पावले उचलावीत आणि आयटी हबसाठी शहरालगत चांगली जागा उपलब्ध करून पायाभूत सुविधांसाठी गुंतवणुकीची तयारी दर्शवावी, असे आवाहन काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी जिल्हाधिकारी अशोक काकडे यांच्याकडे केली.

श्री. पाटील यांनी जिल्हाधिकारी श्री. काकडे यांचा सत्कार करत, सांगलीच्या विकासासाठी सर्व ताकदीने आम्ही प्रशासनाला सहकार्य करू असे सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांनी आयटी क्षेत्रातील संधी साधण्यासाठी प्रशासन पाठपुरावा करेल. जागेचा शोध घेतला जाईल, अशी ग्वाही दिली.

ते म्हणाले, ‘‘भारतात या घडीला सुमारे ५४ लाख कुशल मनुष्यबळ आयटी क्षेत्रात कार्यरत आहे. दरवर्षी साठ हजाराहून अधिक नवीन रोजगार निर्माण होत आहे. ही सांगलीसाठी संधी ठरावी, अशी अपेक्षा आहे. त्यासाठी सांगलीत जागा आणि पायाभूत सुविधा पुरवणे अत्यंत महत्वाचे आहे. या ठिकाणी आय.टी. कंपन्यांचे बॅक ऑफिस सुरु व्हावे, स्थानिक कुशल मनुष्यबळाला काम मिळावे, यासाठी पुढाकार घ्यावा.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘गेल्या चार दशकांत सांगलीच्या उद्योग, व्यापार क्षेत्रात विकास साधता आलेला नाही. हे पेन्शनर्सचे शहर बनले आहे. इथला तरूण नोकरीच्या शोधात पुणे, मुंबई, बंगळूरू, हैद्राबादला जातोय. शहराची वाढ खुंटली आहे. सहा हजाराहून अधिक फ्लॅट विक्रीविना पडून आहेत. हे बदलण्याची क्षमता आयटी क्षेत्रात आहे. पुण्याच्या वाढीला मर्यादा आहेत. या क्षेत्रातील कंपन्या दक्षिण महाराष्ट्रात संधी शोधत आहेत. काही कंपन्या कोल्हापूरला येऊ घातल्या आहेत. सांगलीने त्यांना अधिक सुविधा, सवलती देऊन आमंत्रित करावे. याआधी बारा कंपन्यांनी सांगलीत काम करण्यास इच्छुक असल्याचा प्रस्ताव दिलेला आहे. त्याचाही सकारात्मक विचार करावा.’’ असे प्रतिपादन पृथ्वीराज पाटील यांनी केले.

सरकारकडे पाठपुरावा

पृथ्वीराज पाटील म्हणाले, ‘‘सांगलीची आता राष्ट्रीय महामार्गांशी कनेक्टिव्हिटी आहे. कोल्हापूर विमानतळ दीड तासाच्या अंतरावर आहे. कवलापूर विमानतळाला मान्यता मिळाली तर एअर कनेक्टिव्हीटी आणखी चांगली होईल. शैक्षणिक, वैद्यकिय सुविधांच्या दृष्टीने शहर समृद्ध आहे. आयटी क्षेत्रासाठी आवश्यक अन्य पायाभूत सुविधांसाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करू.’’

यावेळी अजय देशमुख, रुपेश सूर्यवंशी, चंद्रकांत पाटील उपस्थित होते.