| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. २२ एप्रिल २०२५
सांगली जिल्ह्यात अमली पदार्थांच्या प्रसारावर नियंत्रण मिळवण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत कायद्याची अंमलबजावणी, जनजागृती आणि पुनर्वसन या त्रिसूत्रीचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या गुन्ह्यांमध्ये घट झाली आहे, ही सकारात्मक बाब आहे. मात्र, पोलिसांनी यापुढेही सतर्क राहून कायद्याचा धाक कायम ठेवावा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या.
अंमली पदार्थविरोधी टास्क फोर्सच्या आठव्या आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी अशोक काकडे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर, महापालिका आयुक्त सत्यम गांधी, गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे आणि पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी बाळासाहेब यादव उपस्थित होते.
पालकमंत्र्यांनी सांगितले की, टास्क फोर्सच्या सातत्यपूर्ण कारवाया, शैक्षणिक पातळीवरील जनजागृती आणि इतर प्रयत्नांमुळे जिल्ह्यात अमली पदार्थविरोधात जनतेत आणि गुन्हेगारी प्रवृत्तींमध्ये कायद्याचा प्रभाव जाणवत आहे. हा प्रभाव टिकवण्यासाठी पोलिसांनी अधिक सक्रिय राहावे.
यासोबतच, अंमली पदार्थविरोधी प्रबोधन स्पर्धेतील विजेत्यांसाठी १ मे रोजी स्वतंत्र बक्षीस समारंभाचे आयोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. स्पर्धेतील लघुपट आणि जिंगल्स शाळा-महाविद्यालयांमध्ये पुढील शैक्षणिक वर्षापासून दाखवावेत, तसेच दैनंदिन प्रार्थनेवेळी पठणासाठी शपथ व प्रबोधनगीत तयार करून त्याची कार्यवाही करावी, असे त्यांनी सुचवले.
यावेळी व्यसनाधीन व्यक्तींकरिता समुपदेशन, उपचार व पुनर्वसनासाठी केंद्र उभारण्याच्या दृष्टीने तातडीने जागा निश्चित करून कार्यवाही गतिमान करण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. त्यावर जिल्हाधिकारी काकडे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात जागा निश्चित करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले.
प्रभारी पोलीस अधीक्षक रितू खोखर यांनी या क्षेत्रातील कारवायांचा आढावा सादर केला, तर महापालिका आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील डार्क स्पॉट्सवर लक्ष केंद्रीत करून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची माहिती दिली.
क्राईम टास्क फोर्सच्या कामगिरीवर समाधान
गुन्हेगारी नियंत्रणासाठी जिल्ह्यात सुरू असलेल्या क्राईम टास्क फोर्सच्या कार्यवाहीबाबतही पालकमंत्र्यांनी समाधान व्यक्त केले. या टास्क फोर्समुळे गुन्ह्यांची वेळीच उकल होत असून, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण राखले जात आहे.
महानगरपालिका व पोलिस विभागाने मिळून छोट्या टॉवर पोलिस चौक्यांसाठी जागा निश्चित करावी. या ठिकाणांची निवड करताना हवामानातील बदलांचाही विचार व्हावा, असे त्यांनी सुचवले. यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच, गुन्हेगारांना शिक्षा होण्यासाठी न्यायालयात सर्व कागदपत्रे वेळेवर आणि व्यवस्थित सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.