yuva MAharashtra पुण्यात राज्यातील पहिले बीज संमेलन – निसर्गप्रेमासाठी एक प्रेरणादायी पाऊल !

पुण्यात राज्यातील पहिले बीज संमेलन – निसर्गप्रेमासाठी एक प्रेरणादायी पाऊल !


| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २२ एप्रिल २०२५

पर्यावरणप्रेमींना एकत्र आणणाऱ्या आणि जैवविविधतेचे महत्त्व अधोरेखित करणाऱ्या राज्यातील पहिल्या बीज संमेलनाचे आयोजन पुण्यात 25 व 26 एप्रिल रोजी होणार आहे. भारती विद्यापीठ, पुणे आणि सह्याद्री देवराई यांच्या संयुक्त विद्यमाने हे दोनदिवसीय संमेलन पुणे-सातारा रोडवरील धनकवडी शैक्षणिक संकुलात पार पडणार आहे. ‘एक तरी झाड लावूया, चला सावली पेरूया’ हे संमेलनाचे प्रेरणादायी घोषवाक्य आहे.

या उपक्रमाची माहिती देताना सह्याद्री देवराईचे संस्थापक व ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी सांगितले की, पर्यावरणाचे भान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे आणि बियांपासून जंगल निर्माण करण्यासाठीच्या प्रयत्नांमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग घडवणे, हाच या बीज संमेलनाचा मुख्य उद्देश आहे. यावेळी भारती विद्यापीठाचे सहकार्यवाह डॉ. के. डी. जाधव आणि विचारभारतीचे प्रा. मिलिंद जोशीही उपस्थित होते.

दिवस पहिला: निसर्गस्नेही विद्यार्थ्यांसोबत बीज संकलन आणि प्रदर्शने

25 एप्रिल रोजी सकाळी 7 ते संध्याकाळी 6 या वेळेत ताम्हिणी घाटात सह्याद्री देवराईचे 10 तज्ज्ञ मार्गदर्शक राष्ट्रीय सेवा योजना (NSS) अंतर्गत सहभागी विद्यार्थ्यांना शास्त्रीय पद्धतीने बीज संकलनाचे प्रशिक्षण देतील. त्याच दिवशी सकाळी 11 वाजता 'हरित संपत्तीचे दालन' या विशेष प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. अस्मिता जगताप (कार्यकारी संचालिका, हेल्थ सायन्स, भारती विद्यापीठ) यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी पर्यावरणतज्ज्ञ एस. आर. यादव आणि उपवन संरक्षक महादेव मोहिते उपस्थित राहतील.

सायंकाळी 6 ते 9 दरम्यान 'पर्यावरण विशेष चर्चासत्र' होणार असून ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. इरीच भरुचा अध्यक्षस्थानी असतील. संजय पाटील, डॉ. मंदार दातार, डॉ. अपर्णा वाटवे आणि सुहास वैंगणकर हे तज्ज्ञ या परिसंवादात सहभागी होणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून सी. बी. साळुंखे आणि सह्याद्री देवराईचे उपाध्यक्ष अरविंद जगताप उपस्थित राहतील.


दिवस दुसरा: राहीबाई पोपेरेंचा सन्मान आणि बीजतुला सोहळा

26 एप्रिल रोजी 'बीजमाता' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मश्री राहीबाई पोपेरे यांना 'जीवनगौरव' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार ख्यातनाम शास्त्रीय गायक आचार्य पंडित मुकुल शिवपुत्र यांच्या हस्ते प्रदान केला जाईल.

तसेच, संमेलनादरम्यान विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी गोळा केलेल्या बियांमधून विशेष बीजतुला सोहळाही होणार आहे. या सोहळ्याचे प्रमुख केंद्रबिंदू असतील भारती विद्यापीठ शालेय समितीच्या अध्यक्षा विजयमाला पतंगराव कदम.

निसर्गाशी नातं अधिक घट्ट करण्याचा संकल्प

सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे तरुण पिढीला पर्यावरणाचे महत्त्व समजावून देणे, निसर्गाशी आपले नाते घट्ट करणे, आणि बियांपासून जंगल घडवण्याच्या प्रवासात विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष सहभागी करून घेणे. भाषणांपुरते मर्यादित न राहता कृतीतून पर्यावरणप्रेम दाखवण्याची ही एक अद्वितीय संधी आहे.