| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १३ एप्रिल २०२५
मिरज – जिल्ह्यातील तीन माजी आमदार लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. शनिवारी मिरजेत पार पडलेल्या बैठकीत या प्रवेशावर अंतिम निर्णय घेण्यात आला असून, अजित पवार यांनीही याला मंजुरी दिली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्यासोबतही या संदर्भात चर्चा पार पडली आहे.
या नेत्यांचा पक्षप्रवेश पुढील आठवड्यात मुंबईत पार पडणार असल्याचे समजते. या प्रवेशामुळे भाजपचे माजी आमदार विलासराव जगताप, माजी मंत्री शिवाजीराव नाईक आणि माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख हे आता अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सक्रिय होणार आहेत. या तिन्ही नेत्यांनी काही आठवड्यांपूर्वीच यासंदर्भात चर्चा केली होती. त्यानंतर अजित पवार यांच्याशी संपर्क साधून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. विधिमंडळ अधिवेशन आणि अजित पवार यांच्या कुटुंबातील खास कार्यक्रमानंतर या प्रवेशाला गती मिळाली.
विलासराव जगताप यांना यापूर्वी भाजपने पक्षविरोधी कारवायांमुळे निलंबित केले होते. त्यांनी दोन निवडणुकांमध्ये भाजपच्या उमेदवारांविरोधात काम केल्याचा आरोप होता. मात्र त्यांनी पक्षातून निलंबनाआधीच राजीनामा दिल्याचे स्पष्ट केले होते. शिवाजीराव नाईक यांचा राजकीय प्रवास भाजपपासून सुरु होऊन शरद पवार यांच्या गटातून होत आता अजित पवारांच्या राष्ट्रवादीपर्यंत पोहोचला आहे. राजेंद्रअण्णा देशमुख यांनीही भाजपमधून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती. ते पूर्वीपासूनच शरद पवार यांच्या विचारसरणीशी जोडलेले होते.
दरम्यान, माजी आमदार अजितराव घोरपडे यांनी देखील लोकसभा निवडणुकीत भाजप विरोधात उभा असलेल्या उमेदवाराला पाठींबा दिला होता. विधानसभेत मात्र त्यांनी महायुतीसोबत राहण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची प्रक्रिया याआधीच पूर्ण झाली आहे.
"विकासासाठी एकत्र येण्याचा निर्णय"
या पार्श्वभूमीवर बोलताना विलासराव जगताप यांनी सांगितले की, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा आमचा निर्णय पक्का झाला आहे. शनिवारी मिरजेत यासंदर्भात बैठक झाली. खासदार सुनील तटकरे यांच्याशी चर्चा झाली असून, पुढील आठवड्यात मुंबईत आमचा पक्षप्रवेश होणार आहे. जिल्ह्याच्या विकासाला चालना देण्यासाठी आम्ही हा निर्णय एकमताने घेतला आहे.”