yuva MAharashtra बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या कुटुंबाची कार नदीत कोसळली; ४ जणांचा मृत्यू, बोकड मात्र बचावला !

बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या कुटुंबाची कार नदीत कोसळली; ४ जणांचा मृत्यू, बोकड मात्र बचावला !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १२ एप्रिल २०२५

मध्य प्रदेशातील जबलपूरजवळ एक हृदयद्रावक आणि विचित्र अपघात समोर आला आहे. बोकडाचा बळी देण्यासाठी निघालेल्या कुटुंबाची कार अनियंत्रित होऊन नदीत कोसळली. या भीषण घटनेत एकाच कुटुंबातील चार सदस्यांचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे, बळी देण्यासाठी नेण्यात येत असलेला बोकड मात्र या अपघातातून चमत्कारिकरीत्या बचावला आहे.

गुरुवारी दुपारच्या सुमारास जबलपूरपासून सुमारे ३० किलोमीटर अंतरावर चारगव्हाण-जबलपूर मार्गावर ही दुर्घटना घडली. वेगात असलेल्या एसयूव्ही वाहनाचे चालकावर नियंत्रण सुटल्याने कारने पुलाचे रेलिंग तोडले आणि थेट सुमारे ३० फूट खोल कोरड्या नदीत जाऊन कोसळली. धडक एवढी जोरदार होती की वाहनाचा अक्षरशः चुराडा झाला.


अपघातग्रस्त गाडीत पटेल कुटुंबाचे सहा सदस्य प्रवास करत होते. हे सर्वजण नरसिंहपूर येथील दादा दरबार मंदिरात दर्शन घेऊन परतत होते. घरी परतल्यावर बोकड व कोंबड्याचा बळी देवून मटणाची मेजवानी करण्याचा त्यांचा बेत होता. मात्र नियतीला काहीतरी वेगळंच मान्य होतं – त्याआधीच अपघात घडला आणि सर्व काही उद्ध्वस्त झालं.

चारगव्हाण पोलिस स्टेशनचे प्रभारी अधिकारी अभिषेक प्यासी यांनी सांगितले की, "दुपारी ३ ते ४ च्या दरम्यान ही घटना घडली. कार अनियंत्रित होऊन नदीत कोसळली. चार मृत्यू झाले असून दोन जखमींवर उपचार सुरू आहेत."

स्थानिकांनी आवाज ऐकून पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले. गाडीचा चेंदामेंदा झाल्यामुळे मृतदेह आणि जखमींना बाहेर काढताना अडचणी आल्या. सध्या पोलीस अपघाताच्या कारणांचा शोध घेत असून, जखमींच्या जबाबाची प्रतीक्षा केली जात आहे.

या अनपेक्षित दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे आणि बोकड वाचल्याची बाब अनेकांच्या चर्चेचा विषय ठरत आहे.