| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १३ एप्रिल २०२५
"सांगली जिल्ह्यातील उद्योजकांना शासकीय पातळीवर सर्वतोपरी सहकार्य दिले जाईल," असे आश्वासन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी गुंतवणूक शिखर परिषदेत दिले. उद्योग संचालनालय, मैत्री, आणि जिल्हा उद्योग केंद्र सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने हॉटेल ककून, सांगली येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती.
या वेळी जिल्हाधिकारी काकडे यांनी नवउद्योजकांना प्रेरणा देत उदाहरणांच्या माध्यमातून उद्योगाचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी जिल्ह्यात अधिकाधिक गुंतवणूक करून रोजगार निर्मितीच्या माध्यमातून स्थानिक विकासास हातभार लावण्याचे आवाहन केले.
या परिषदेला पुणे विभागीय सहसंचालक एस. जी. रजपूत, जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी, एमआयडीसीच्या प्रादेशिक अधिकारी वसुंधरा बिरजे, सांगली मिरज मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे विनोद पाटील, कृष्णा व्हॅली असोसिएशनचे रमेश आरवाडे, मैत्रीच्या नोडल अधिकारी डॉ. प्रियदर्शनी सोनार यांच्यासह विविध औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आणि उद्योजक उपस्थित होते.
परिषदेमध्ये 149 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या असून, यामुळे 3480 कोटी रुपयांची गुंतवणूक जिल्ह्यात होणार आहे. याच माध्यमातून सुमारे 6344 नवयुवकांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील. जिल्ह्याचा विकास, रोजगार निर्मिती आणि अर्थव्यवस्थेच्या बळकटीसाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरेल.
महाव्यवस्थापिका विद्या कुलकर्णी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक करताना परिषदेच्या उद्दिष्टांवर प्रकाश टाकला. मागील वर्षी झालेले 61 सामंजस्य करारांपैकी 51 उद्योगांनी प्रत्यक्ष उत्पादनास सुरुवात केल्याचे त्यांनी सांगितले.
या परिषदेत विनोद पाटील यांनी उद्योग सुरू करताना उद्योजकांना भेडसावणाऱ्या समस्यांची मांडणी केली. तर सहसंचालक एस. जी. रजपूत यांनी औद्योगिक विकास, धोरणात्मक निर्णय, आणि रोजगार निर्मितीच्या संधी यावर सखोल माहिती दिली. त्यांनी सांगली जिल्हा उद्योग केंद्राने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात मिळवलेल्या यशाबद्दल कौतुकही केले.
प्रमुख गुंतवणूक करणाऱ्या कंपन्यांमध्ये –
द सुप्रीम इंडस्ट्रीज लि. (560 कोटी, 1120 रोजगार)
आष्टा लायनर्स प्रा. लि. (125 कोटी, 300 रोजगार)
कस्तुरी फाउंड्री प्रा. लि. (135 कोटी, 300 रोजगार)
परिवार बेकर्स (68 कोटी, 136 रोजगार)
विरेशा कास्टिंग्ज प्रा. लि. (30 कोटी, 60 रोजगार)
शाह लागू प्रॉपर्टीज (100 कोटी, 200 रोजगार)
या परिषदेमध्ये विविध विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. डॉ. प्रियदर्शनी सोनार यांनी ‘मैत्री’ पोर्टलसंदर्भात माहिती दिली. एस. एल. शिनू (सिडबी) यांनी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांचे महत्त्व पटवून दिले. कांचन कुलकर्णी यांनी उद्योजकता कर्ज व डिजिटल लोनविषयी मार्गदर्शन केले. तसेच अमेय मिसाळ (रॅम्प प्रकल्प), अख्तर बोरगावे (औद्योगिक विमा), आणि श्रीजीत नायर (निर्यात धोरण) यांनी सविस्तर माहिती दिली.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित उद्योजकांच्या प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात आली. श्री. रजपूत आणि मैत्रीच्या सल्लागार निधी शेट्टी यांनी शंका निरसन सत्रात सहभाग घेतला.
या गुंतवणूक परिषदेला 318 पेक्षा अधिक उद्योजक उपस्थित होते. सांगली जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला गती देण्यासाठी ही परिषद मैलाचा दगड ठरणार आहे.