| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ एप्रिल २०२५
चिपळूण येथे 'चिपळूण न्यूज' या युट्यूब चॅनलच्या संपादिका स्वाती हडकर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा तीव्र निषेध करताना अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी स्पष्टपणे म्हटले की, "बातमीसाठी आवाज उठवणाऱ्या पत्रकारावर अन्याय झाला, तर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणं ही आमची नैतिक जबाबदारी आहे."
स्वाती हडकर या गेल्या काही काळापासून चिपळूण परिसरातील अवैध वाळू उपशावर सातत्याने पत्रकारितेच्या माध्यमातून प्रकाश टाकत होत्या. काल रात्री त्यांनी रेती उत्खननाच्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन चित्रीकरण सुरू केले असता, संबंधित माफियांनी त्यांच्यावर हल्ला चढवला. गंभीर अवस्थेत त्यांना चिपळूणमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
स्थानिक राजकीय वरदहस्त लाभलेल्या रेती माफियांविरोधात पत्रकारांनी आवाज उठवल्यामुळे त्यांच्यावर अशा स्वरूपाचे हल्ले होत असल्याचे बोलले जाते. हडकर यांच्या सततच्या रिपोर्टिंगमुळे संबंधितांच्या मनात चीड निर्माण झाली होती.
या घटनेनंतर पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीसह अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेकडून या कृत्याचा जोरदार शब्दांत निषेध व्यक्त करण्यात आला असून, दोषींवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.
एस. एम. देशमुख म्हणाले की, "एखाद्या पत्रकारावर हल्ला झाला की, त्याच्या चारित्र्यावरच शंका घेतली जाते. कुणी त्याला बनावट ठरवतं, कुणी खंडणीखोर म्हणतं – ही एक रचना असते, ज्यामुळे जनतेची सहानुभूती पत्रकाराला मिळू नये. ही भूमिका काही वेळा हितसंबंधी लोकांच्याच नव्हे, तर काही सहकारी पत्रकारांचीदेखील असते, हे दुर्दैव आहे."
ते पुढे म्हणाले, "तुषार खरात असो वा स्वाती हडकर, या दोन्ही प्रकरणांमध्ये आम्ही हीच दु:खद गोष्ट अनुभवली. काहीजण तर असा हल्ला झालाच नाही असं म्हणतात. मात्र, वस्तुस्थिती आणि पुरावे सर्वांसमोर आहेत. अशा वेळेस एकमेकांवर शंका घेण्याऐवजी एकजूट दाखवणं गरजेचं आहे, अन्यथा आपणच आपल्या व्यासपीठाचं नुकसान करत राहू."
“पत्रकारांनी मतभेद बाजूला ठेवून अन्यायाच्या विरोधात एकत्र येणं गरजेचं आहे. अन्यथा या पद्धतीने पत्रकारांना एकेक करून लक्ष्य केलं जात राहील. आपलेच लोक जर अशा वेळी पाठ फिरवणार असतील, तर हल्लेखोरांचे मनोबल अधिकच वाढेल,” असा इशारा देशमुख यांनी दिला.