| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १५ एप्रिल २०२५
सांगली व कुपवाड शहरातील वाढत्या लोकसंख्येला भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येवर उपाय म्हणून महापालिकेने ‘वारणा उद्भव पाणीपुरवठा योजना’ पुढे रेटली आहे. या योजनेसाठी 450 कोटी रुपयांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) पुण्यातील सल्लागार संस्थेने महापालिकेला सादर केला असून सध्या या अहवालाची तपासणी सुरू आहे.
या प्रकल्पाअंतर्गत सांगली व कुपवाड परिसरात सुमारे 550 किलोमीटर लांबीची अंतर्गत नवीन जलवाहिनी टाकली जाणार आहे. याशिवाय गावठाणातील जुन्या जलवाहिन्या बदलून नव्या पाइपलाईनची उभारणी होणार आहे. जीवन प्राधिकरणाची तांत्रिक मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रकल्प शासनाकडे अंतिम प्रशासकीय मान्यतेसाठी पाठवला जाणार आहे.
2055 पर्यंतच्या लोकसंख्येचा विचार
या योजनेचा आराखडा तयार करताना सांगली आणि कुपवाड शहरांची 2055 सालापर्यंतची संभाव्य लोकसंख्या गृहित धरून संपूर्ण आराखडा बनवण्यात आला आहे. सल्लागार संस्थेने चार महिने सखोल सर्वेक्षण करून डीपीआर तयार केला आहे.
जलशुद्धीकरणाची नवी सुविधा
माळबंगला येथे सध्या कार्यरत असलेले 56 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र जुने झाल्याने टप्प्याटप्प्याने ते बंद करण्यात येणार आहे. त्याजागी नवीन 81 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात येईल. या योजनेद्वारे शहराला दररोज 20 एमएलडी अधिक पाणी उपलब्ध होणार आहे.
महत्त्वाच्या बाबी - वारणा उद्भव योजना
समडोळीतील कोळकी परिसरात जॅकवेलपासून पाण्याचा उपसा
माळबंगल्यापर्यंत 11 किमी लांबीची मुख्य जलवाहिनी
नदी ओलांडण्यासाठी 300 मीटर लांबीचा ब्रीज
सांगली, कुपवाड व आजूबाजूच्या परिसरात 550 किमी अंतर्गत पाइपलाइन
81 एमएलडी क्षमतेचे जलशुद्धीकरण केंद्र उभारले जाणार