yuva MAharashtra भगवान महावीर अध्यासन केंद्र : एक स्वप्न वास्तवात उतरले !

भगवान महावीर अध्यासन केंद्र : एक स्वप्न वास्तवात उतरले !


| सांगली समाचार वृत्त |
कोल्हापूर - दि. १९ एप्रिल २०२५

भगवान महावीर अध्यासन केंद्राच्या पायाखुदाई समारंभाने एक नवे पर्व सुरु झाले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने हा समारंभ थाटात पार पडला आणि या क्षणाचा साक्षीदार होण्याचा आम्हा सर्वांना आनंद झाला. हे केंद्र केवळ एक इमारत नाही, तर विचारांची, अहिंसेची, क्षमाशीलतेची आणि तत्त्वज्ञानाची उजळणी करणारा एक दीपस्तंभ ठरणार आहे. अनेक वर्षांपासून या अध्यासन केंद्रासाठी प्रयत्न सुरू होते. अनेकांच्या मनात हा विचार रुजलेला होता, पण प्रत्यक्ष कृतीला वळण लागायला वेळ लागला.

या कामाला खऱ्या अर्थाने दिशा दिली ती डॉ. मनोज पाटील सरांनी. शिवाजी विद्यापीठात ते प्रतिनिधी म्हणून निवडले गेले आणि त्यांनी या प्रकल्पासाठी झपाटून काम सुरू केले. त्यांनी समाजात, आपल्या मित्रपरिवारात याची जागृती निर्माण केली. विचारांची मशागत करत त्यांनी देणगी संकलनाचे कार्य केवळ ध्यासाने नव्हे, तर जबाबदारीने पूर्ण केले.


अल्पावधीतच त्यांनी हे टार्गेट गाठले आणि आज पायाखुदाईच्या पवित्र क्षणापर्यंत हे स्वप्न पोहोचले. मात्र, दुर्दैवाने आजच्या या सोहळ्याला ज्यांचे योगदान अमूल्य आहे, ते डॉ. मनोज पाटील सर काही अपरिहार्य कारणांमुळे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांच्या अनुपस्थितीची सर्वांनाच मनापासून खंत वाटली. पण त्यांच्या कार्याचे फळ आज आपण अनुभवत आहोत. या अध्यासन केंद्राचे उभारणीकार्य ही त्यांच्याच दूरदृष्टी आणि बांधिलकीची साक्ष देणारी गोष्ट ठरणार आहे.

डॉ. मनोज पाटील सरांना या कार्यासाठी मनापासून धन्यवाद व पुढील टप्प्यांसाठी शुभेच्छा! भगवान महावीरांच्या तत्त्वांचा प्रसार करणाऱ्या या अध्यासन केंद्राचे भविष्य उज्ज्वल असो, हीच प्रार्थना!

— सुहास रायनाडे