| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १२ एप्रिल २०२५
भारतीय रेल्वेच्या अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर, कराड यांच्यासह एकूण १३२ रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत देशभरातील प्रमुख रेल्वे स्थानकांचे आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पुनर्विकास करण्यात येणार असून, प्रवाशांसाठी दर्जेदार सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या उपस्थितीत ही घोषणा करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री वैष्णव यांचे आभार मानले.
या योजनेत समाविष्ट असलेल्या महत्त्वाच्या स्थानकांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर (मध्य व पश्चिम), अंधेरी, टिळक टर्मिनस, पुणे, नाशिक रोड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, परभणी, सोलापूर, सातारा, सांगली, अमरावती, भुसावळ यांचा समावेश आहे. याशिवाय अकलकोट रोड, दौंड, इगतपुरी, चांदा फोर्ट, मालाड, डोंबिवली, चिंचवड यांसारख्या उपनगरीय आणि ग्रामीण भागांतील स्थानकांचाही यात समावेश करण्यात आला आहे.
योजना पूर्णत्वास गेल्यानंतर या स्थानकांवर वेटिंग लाऊंज, फूड कोर्ट्स, स्वच्छ व सुसज्ज शौचालये, लिफ्ट्स, एस्कलेटर्स व डिजिटल माहिती पटल यांसारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होतील. यासोबतच स्थानकांचे रूपडे बदलून ते अधिक आकर्षक बनवले जाईल आणि स्थानिक शहरांशी त्यांचे दळणवळण अधिक सुलभ केले जाईल.