yuva MAharashtra "लांब कानाचं कुत्रं भारतात पाहिलंय का ? वाघ्या कुत्र्यावरून वाद नको!" – खासदार उदयनराजेंची परखड प्रतिक्रिया !

"लांब कानाचं कुत्रं भारतात पाहिलंय का ? वाघ्या कुत्र्यावरून वाद नको!" – खासदार उदयनराजेंची परखड प्रतिक्रिया !

फोटो सौजन्य  : दै. दिव्यमराठी

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ एप्रिल २०२५

छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य राष्ट्रीय स्मारक दिल्लीमध्ये व्हावं, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली आहे. मुंबईतील अरबी समुद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते स्मारकाचे भूमीपूजन झाले होते, आणि त्यावेळी ते स्वतः उपस्थित होते. मात्र, पर्यावरणामुळे तिथे प्रत्यक्ष स्मारक उभारण्यात अडचणी असतील, तर मुंबईतील गव्हर्नर हाऊसची सुमारे ४८ एकर जागा या कामासाठी वापरण्यात यावी, असा प्रस्ताव त्यांनी मांडला. “एक राज्यपाल राहण्यासाठी इतकी मोठी जागा कशाला लागते?” असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. या प्रस्तावासंदर्भात ते लवकरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करणार आहेत.

"छत्रपतींनी लोकशाहीचा पाया घातला"

“छत्रपती शिवाजी महाराजांनी रचलेलं राज्य हे रयतेचं होतं. आज ज्या लोकशाहीमध्ये आपण जगतो, तिचं मूळ तिथेच आहे,” असं सांगत उदयनराजे म्हणाले की, “मी ज्या मागण्या मांडतोय, त्यासाठी सरकारी निधीची गरजच नाही.”

'फुले' चित्रपटाच्या सेन्सॉरवर मत

महात्मा फुलेंवर आधारित 'फुले' या चित्रपटावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतल्यानंतर उदयनराजेंनी प्रतिक्रिया दिली. “जसं छत्रपती महाराजांबाबत काटेकोर भूमिका घेतली जाते, तसं महात्मा फुले यांच्याबाबतही घ्यायला हवी. इतिहासाचं सन्मानपूर्वक चित्रण व्हावं, यासाठी विशेष सेन्सॉर बोर्ड असावं, जे इतिहासतज्ज्ञांपासून बनलेलं असेल,” अशी मागणी त्यांनी केली. ‘छावा’ चित्रपटाच्या वादावरही त्यांची हिच भूमिका होती.


दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या वादावर स्पष्ट मत

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाबाबत उदयनराजेंनी आपली भूमिका मांडताना सांगितले की, “ही जागा सरकारची आहे आणि हॉस्पिटल चॅरिटेबल म्हणून ओळखलं जातं. पण प्रत्यक्षात किती गरजू रुग्णांवर मोफत उपचार केले जातात? सगळ्याच चॅरिटेबल रुग्णालयांचं ऑडिट व्हायला हवं.”

वाघ्या कुत्र्याच्या वादावर थेट भूमिका

रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या शिल्पावरून सुरू असलेल्या वादावरही उदयनराजेंनी रोखठोक मत मांडलं. “वाघ्या नावाचं लांब कानाचं कुत्रं भारतात कुठे दिसतं? हे तर ब्रिटिशांनी आणलेलं कुत्रं आहे. अशा गोष्टींचं अति कौतुक करू नये, गरज असेल तर फेकून द्या,” असा थेट सल्ला त्यांनी दिला.