yuva MAharashtra भ्रष्ट नेतृत्व आणि प्रशासनामुळे प्रगती केवळ कागदावरच - डॉ. ज्ञानेश्वर मुळे

भ्रष्ट नेतृत्व आणि प्रशासनामुळे प्रगती केवळ कागदावरच - डॉ. ज्ञानेश्वर मुळे


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ एप्रिल २०२५

"जेथे राजकीय नेतृत्व आणि प्रशासन भ्रष्ट असते, तेथे विकास फक्त फाईलमध्येच राहतो," असे स्पष्ट मत निवृत्त परराष्ट्र सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी मांडले. सांगलीतील क्रेडाई संस्थेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या पदग्रहण कार्यक्रमात ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.

डॉ. मुळे यांनी आपल्या भाषणात सध्याच्या राजकीय, सामाजिक व सांस्कृतिक व्यवस्थेवर ठाम आणि स्पष्ट भाष्य केले. त्यांनी सांगितले की, सध्या जगभरात तसेच भारतात देखील प्रभावी विचारवंतांची कमतरता आहे. जे संपूर्ण मानवजातीसाठी दिशा ठरवतील, असे तत्ववेत्ते आता दिसत नाहीत.

लोकांचा व्यवस्थेवर विश्वास उरलेला नाही

डॉ. मुळे म्हणाले, "सध्याची व्यवस्था बघितली तर नागरिकांचा प्रशासनावर, आणि प्रशासनाचा नागरिकांवर विश्वास राहिलेला नाही. राजकारण, प्रशासन आणि सामान्य लोक यांच्यात गुन्हेगारी वृत्ती वाढताना दिसते आहे. कायदा आणि सुव्यवस्थेची यंत्रणा अधिकाधिक दडपशाही होत चालली आहे. त्यामुळे काही क्षेत्रांमध्ये प्रगती होऊनही देशाचा एकूण विकास मागेच पडतो आहे."

गावपण हरवले, नातीगोती कुठायंत ?

गावांची ओळख असलेले आपलेपण हरवत चालले आहे. माणसामाणसांतील संबंध हलके झाले असून, एकोप्याची भावना कमी होत आहे. यामुळेच फिनलँडसारख्या सर्वात आनंदी देशाशी भारताची तुलना करणे कठीण होत आहे, असे त्यांनी सांगितले.


नवीन भारताचे चित्र अजून अस्पष्ट

बांधकाम क्षेत्राचा उल्लेख करताना डॉ. मुळे म्हणाले की, "देशात 'नवा भारत' आकार घेतोय, हे चित्र अजून स्पष्ट नाही. चंदीगढनंतर एकही सुबक, नियोजनबद्ध शहर निर्माण झालेले नाही. केवळ इमारती उभारल्या, पण नवकल्पनांची कमतरता स्पष्ट आहे."

चांगल्या व्यक्ती निवडा - डॉ. मुळे यांचे आवाहन

अभिनेते नाना पाटेकर आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चर्चेचा उल्लेख करत, मुळे म्हणाले, “फडणवीस यांनी स्पष्ट सांगितले की, चांगल्या लोकांना उमेदवारी न मिळण्यामागे कारण म्हणजे जनता त्यांना निवडून देत नाही. त्यामुळे आता ही जबाबदारी मतदारांची आहे की, योग्य व्यक्तींनाच निवडून द्यावे.”

नितीन गडकरी यांच्याकडे दूरदृष्टी

"केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देशाचे खरे राष्ट्रदृष्ट्या विचार करणारे नेते आहेत," असे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

शाहू महाराज हे दूरदृष्टीचे प्रतीक

राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांची आठवण करून देत, डॉ. मुळे म्हणाले, "शाहू महाराजांनी सर्वच क्षेत्रात क्रांतिकारी काम केले. त्यांनी शिक्षण, पर्यावरण, क्रीडा, अर्थव्यवस्था, बांधकाम अशा प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवला. आजच्या नेत्यांनी त्यांच्या कार्यशैलीचा अभ्यास केला पाहिजे."

अवैध बांधकामांची देशव्यापी समस्या

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा यांच्या स्टुडिओचे अवैध बांधकाम हटवले गेले, याचा उल्लेख करत डॉ. मुळे म्हणाले, "जर देशातील सर्वच अवैध बांधकामे पाडायची ठरवली, तर देशाचा 30 ते 40 टक्के भाग नव्याने उभारावा लागेल. आज अतिक्रमण न केलेला माणूस सापडणे कठीण झाले आहे."