yuva MAharashtra अलमट्टी धरण उंचीवाढीच्या निर्णयाला विरोधाचा जोर; भविष्यातील धरणग्रस्ततेचा धोका वाढण्याची शक्यता !

अलमट्टी धरण उंचीवाढीच्या निर्णयाला विरोधाचा जोर; भविष्यातील धरणग्रस्ततेचा धोका वाढण्याची शक्यता !

फोटो सौजन्य : pixahive.com

| सांगली समाचार वृत्त |
शिरोळ - दि. २० एप्रिल २०२५

कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव मांडल्यानंतर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात चिंता वाढली होती. या प्रस्तावामुळे भविष्यात महापुराचा धोका अधिक वाढण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. सध्या धरणाची उंची ५१९ मीटर असून, ती ५२४.२५६ मीटरपर्यंत नेण्याचे नियोजन कर्नाटक सरकारने केले होते. मात्र सर्वोच्च न्यायालयाने यावर स्थगिती दिल्याने शेतकऱ्यांना व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे, अशी माहिती खासदार धैर्यशील माने यांनी 'नवराष्ट्र'शी बोलताना दिली.

या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पातळीवर येत्या महिन्याच्या अखेरीस केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. त्याआधी स्थानिक ग्रामस्थांनी आपला विरोध नोंदवावा, असे आवाहन 'आंदोलन अंकुश' संघटनेने केले आहे. यासाठी त्यांनी रजिस्टर पोस्टद्वारे आपली हरकती सादर करण्याचे आवाहन ग्रामस्थांना केले आहे.

या मुद्द्यावर आंदोलन अंकुशचे जिल्हाध्यक्ष दीपक पाटील, सरपंच सारिका कदम, अमित कदम, हैदर मोकाशी, रशीद मुल्ला, रामगोड पाटील, गणेश पाखरे, मियाखान मोकाशी, जहांगीर सनदी यांच्यासह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने एकवटले होते.


पश्चिम महाराष्ट्रातील सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांना दरवर्षी पावसाळ्यात महापुराचा मोठा तडाखा बसतो. या पुरस्थितीला अलमट्टी धरणातून केलेली अनियमित पाणी सोडणूक जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक शेतकरी आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने करत आहेत. या धरणाची १२३ टीएमसी क्षमतेमुळे पुराचा फटका अधिक तीव्र होतो, अशी तक्रारही मांडण्यात आली होती.

सिंचन आणि इतर विकासकामांच्या दृष्टीने धरणाची उंची वाढवण्याची भूमिका कर्नाटक सरकारने घेतली असली, तरी महाराष्ट्रातील पुरस्थितीचा विचार करता हा निर्णय धोकादायक ठरू शकतो, असे स्थानिकांचे मत आहे.