yuva MAharashtra पनीरप्रेमींना धक्का: 702 नमुन्यांच्या तपासणीत उघड झाली धक्कादायक माहिती !

पनीरप्रेमींना धक्का: 702 नमुन्यांच्या तपासणीत उघड झाली धक्कादायक माहिती !

फोटो सौजन्य : Wikimedia commons 

| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २० एप्रिल २०२५

पनीर हा केवळ शाकाहारी नव्हे, तर मांसाहारी व्यक्तींनाही प्रिय असलेला खाद्यपदार्थ आहे. कोणतीही पार्टी किंवा कार्यक्रम असो, पनीरचा मेन्यूमध्ये समावेश नक्कीच असतो. मात्र, अलीकडील तपासणीतून पनीरप्रेमींना सावध होण्याचा सल्ला देण्यात येत आहे.

अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने देशभरातून घेतलेल्या 702 अन्न नमुन्यांच्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आली आहे — पनीरमध्ये सर्वाधिक भेसळ आढळून आली आहे. तपासणीदरम्यान काही नमुन्यांत स्टार्च, डिटर्जंट, युरिया यांसारखे आरोग्यास हानिकारक घटक आढळले.

ही भेसळ इतकी गंभीर आहे की, काही ठिकाणी पनीर हे खरे दूध वापरून बनवले गेलेले नव्हते, तर त्यात रासायनिक पदार्थांचा वापर करण्यात आला होता. अनेक नमुन्यांत पाण्याचे प्रमाण आणि स्टार्चची मात्रा अधिक असल्याने पोषणमूल्य कमी झाले आहे.


तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, अशा प्रकारचे भेसळयुक्त पनीर सेवन केल्याने अपचन, अ‍ॅलर्जी तसेच दीर्घकालीन आजार उद्भवू शकतात. विशेषतः लहान मुले आणि वयोवृद्ध यांच्यासाठी हे अधिक घातक ठरू शकते. त्यामुळे FSSAI ने ग्राहकांना पनीर खरेदी करताना शुद्धता तपासण्याचा आणि नामांकित व प्रमाणित ब्रँडचाच वापर करण्याचा सल्ला दिला आहे.

या पार्श्वभूमीवर पुण्यातील मांजरी परिसरात भेसळयुक्त पनीर तयार करणाऱ्या एका फॅक्टरीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट सहा आणि अन्न व औषध प्रशासन विभागाने संयुक्त कारवाई केली. यावेळी सुमारे 11 लाख 56 हजार रुपयांचे भेसळयुक्त पनीर आणि विविध मुद्देमाल हस्तगत करण्यात आले होते. प्रशासनाकडून नागरिकांनी पनीर खरेदी करताना सावधानता बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.