| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. १८ एप्रिल २०२५
एसटी महामंडळाच्या बससेवेचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी प्रवासादरम्यान विश्रांतीसाठी काही निश्चित थांबे असतात. मात्र या ठिकाणांवरील हॉटेल्समध्ये मिळणारे अन्न चवहीन, महाग आणि आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. याशिवाय महिलांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा अभावही अनेक ठिकाणी दिसून येतो.
या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधित सर्व हॉटेल्स व मोटेल्सची सखोल तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. प्रवाशांना जर योग्य आणि परवडणारे अन्न व स्वच्छ सुविधा मिळत नसतील, तर अशा थांब्यांना तात्काळ रद्द करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.
प्रवाशांच्या आरोग्यासाठी कोणतीही तडजोड न करता, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता कठोर पावले उचलावीत, असे निर्देशही मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. राज्यभरातील सर्व थांब्यांचे पुन्हा एकदा सर्वेक्षण करून तेथील सुविधा तपासून पाहाव्यात आणि त्याचा अहवाल येत्या १५ दिवसांत सादर करावा, असे त्यांनी सांगितले.
लांब पल्ल्याच्या प्रवासात थांबणाऱ्या हॉटेल्समधून वारंवार मिळणाऱ्या तक्रारींमध्ये शिळा व अस्वच्छ खाण्याचे पदार्थ, अस्वच्छ प्रसाधनगृहे, आणि कर्मचाऱ्यांचे अयोग्य वर्तन यांचा समावेश आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुविधांची कसून पाहणी करून केवळ दर्जेदार सुविधा असणाऱ्या थांब्यांनाच पुढे मान्यता दिली जाईल, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.