| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १८ एप्रिल २०२५
"भाजपने जिल्ह्यात जातीचे राजकारण सुरू केले म्हणून मी पहिल्यांदा आवाज उठवला, तुमच्यासाठी पाठबळ दिलं आणि खासदारपद मिळवून दिलं. पण आज तुम्हीच आमच्याकडे पाठ फिरवत आहात," अशा शब्दांत आमदार विलासराव जगताप यांनी खासदार विशाल पाटील यांच्यावर नाराजी व्यक्त केली.
जत विकास सोसायटीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना, त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपवर घणाघात केला. ते म्हणाले, "भाजपने जाती-पातीवर आधारित फोडाफोडीची राजकारणं केली आणि त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली. या परिस्थितीत मी पहिला आवाज उठवला. तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिलो. पण आज तुम्ही आम्हालाच दूर ठेवत आहात."
जगतात यांनी स्पष्ट केलं की, सध्या जिल्ह्यात नेत्यांची स्थिती गोंधळलेली आहे. "जयंत पाटील यांची भूमिका अस्पष्ट आहे, तर विश्वजित कदम भाजपविरोधात ठोसपणे बोलताना दिसत नाहीत. त्यामुळे तरुणांमध्ये संभ्रम निर्माण होतोय आणि त्याचा थेट फायदा भाजपला होतो आहे," असं त्यांनी सांगितलं.
"तुम्हालाही मंत्रीपदाची ऑफर मिळाली आहे, हे माहित आहे. आणि तुम्ही मंत्री झालात तरी आनंदच आहे. पण त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे भाजपच्या जातीय राजकारणाच्या विरोधात पुरोगामी विचारांची चळवळ उभी करणे ही काळाची गरज आहे," असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला.
वसंतदादांचा वारसा जपण्याची जबाबदारी तुमच्यावर – जगताप यांचा सल्ला
"तुम्ही स्वर्गीय वसंतदादांचे नातू आहात. त्यांनी राज्यात पुरोगामी विचारांची मशाल पेटवली. आज ती मशाल पुढे नेण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. म्हणूनच, आक्रमक भूमिका घ्या, आणि नव्या तरुण नेतृत्वाला एकत्र करून भाजपच्या विचारसरणीला जोरदार उत्तर द्या," असा सल्ला जगताप यांनी दिला.
याच कार्यक्रमाआधी, दोन दिवसांपूर्वी मिरजेत जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांची बैठक झाली होती. त्यात जिल्ह्यात मोठ्या राजकीय हालचाली घडवण्याचा निर्णय झाला असून, या पार्श्वभूमीवर जगताप यांच्या भाषणातून भाजप विरोधात अधिक आक्रमक रणनीती स्वीकारण्याचा स्पष्ट संकेत मिळाला आहे.