| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. २४ एप्रिल २०२५
जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कडक पावलं उचलली आहेत. दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी झालेल्या कॅबिनेट सुरक्षा समिती (CCS) च्या तातडीच्या बैठकीत मोठे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शाह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर हे सहभागी होते. सुमारे तीन तास चाललेल्या बैठकीनंतर परराष्ट्र मंत्रालयाने पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.
परराष्ट्र मंत्रालयाने स्पष्ट केले की, पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानचा थेट सहभाग आढळून आल्याने भारताने काही ठोस आणि निर्णायक पावले उचलली आहेत.
महत्त्वपूर्ण निर्णय -
- पाक नागरिकांना व्हिसा बंद : भारतात पाकिस्तानी नागरिकांसाठी दिला जाणारा व्हिसा तात्काळ रद्द करण्यात आला असून नवीन व्हिसा देण्यास बंदी घालण्यात आली आहे.
- ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश : भारतात सध्या असलेले पाकिस्तानी नागरिक ४८ तासांत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- अटारी-वाघा सीमा बंद : भारत-पाकिस्तानमधील अटारी-वाघा बॉर्डर १ मेपर्यंत पूर्णतः बंद राहणार आहे.
- सिंधू जल करार रद्द : भारत-पाकिस्तानमधील सिंधू नदी पाण्याचा करार देखील रद्द करण्यात आला आहे.
- पाक उच्चायुक्तालय बंद : भारतातील पाकिस्तानी दूतावास बंद करण्यात आला असून ५ वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
- भारतीय नागरिकांना परतण्याचे आवाहन : त्याचवेळी, पाकिस्तानात गेलेले भारतीय नागरिक सध्या तेथेच असतील, त्यांनी १ मेपूर्वी भारतात परत यावे, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे.
पहलगाम हल्ल्यात निष्पापांचे बळी – २७ जण ठार
पहलगाममध्ये झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात २७ निष्पाप पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. या हल्ल्यात ६ दहशतवादी सामील होते, आणि त्यांनी एके-४७ रायफल्सचा वापर केला. भारतीय सुरक्षा दलांनी तत्काळ शोधमोहीम राबवून परिसरात ड्रोनच्या मदतीने तपास सुरू केला आहे.
हल्ल्याचे मुख्य सूत्रधार असिफ फौजी, सुलेमान शाह आणि अबू तल्हा अशी संशयित दहशतवाद्यांची नावे आहेत. हे दहशतवादी अंदाजे दोन आठवड्यांपूर्वी सीमेलगतच्या भागातून भारतात शिरले आणि राजौरी-उधमपूर मार्गे पहलगाममध्ये पोहोचले होते. सुरक्षा यंत्रणा सध्या रियासी आणि उधमपूर परिसरात सखोल तपास करत आहेत.
CCS बैठकीत संवेदना आणि ठोस भूमिका
या घटनेनंतर पार पडलेल्या सीसीएस बैठकीत हल्ल्याचा सखोल आढावा घेण्यात आला. हल्ल्यात बळी पडलेल्या नागरिकांप्रती संवेदना व्यक्त करताना, भारताने या दहशतवादी कारवायांवर कठोर उत्तर देण्याचा निर्धार व्यक्त केला. परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, आंतरराष्ट्रीय स्तरावरही या घटनेबाबत अनेक देशांनी दुःख व्यक्त केले आहे.