| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ एप्रिल २०२५
अलिकडच्या काही वर्षांत सांगली जिल्ह्याला सक्षम नेतृत्वाचा अभाव जाणवत असल्याने अनेक विकासकामे रखडली आहेत. मात्र आता नागरिक राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे आशेने पाहू लागले असून, जिल्ह्याचा रखडलेला विकास मार्गी लावण्यासाठी आवश्यक निधी दिला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.
मुंबई येथे मंगळवारी सायंकाळी झालेल्या एका कार्यक्रमात सांगली जिल्ह्यातील माजी आमदार शिवाजी नाईक, विलास जगताप, राजेंद्र देशमुख, माजी जिल्हा परिषद सभापती तमणगोंडा रविपाटील, मुन्ना कुरणे, माजी भाजयुवा जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मध्ये प्रवेश केला. यावेळी पवार यांनी त्यांचे स्वागत केले. खासदार सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते.
अजित पवार म्हणाले की, “सांगली जिल्ह्याचा समृद्ध इतिहास आहे. यशवंतराव चव्हाण व वसंतदादा पाटील यांचं योगदान अतुलनीय आहे. जिल्ह्यात विकासकामे निधीअभावी थांबू देणार नाही. पक्षबांधणीसाठी सर्वांना समान संधी मिळेल. राष्ट्रवादी हा पक्ष नसून, एकत्र काम करणारे कुटुंब आहे. जुन्या-नव्या कार्यकर्त्यांमध्ये भेदभाव केला जात नाही. आपण सर्वांनी एकत्र येऊन महाराष्ट्राचा विकास साधावा.”
कार्यक्रमात स्वागतपर भाषण करताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले, “सांगलीतील दहशतवादी राजकारणाची समाप्ती झाली आहे. जिल्ह्यातील सहकारी संस्था अडचणीत आहेत, तर बेरोजगारीचा प्रश्नही गंभीर आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या प्रश्नांवर उपाय शोधला जाईल.”
या कार्यक्रमाला आमदार शिवाजी गर्जे, इद्रीस नायकवडी, जिल्हाध्यक्ष प्रताप पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, आटपाडी पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख आदी मान्यवरही उपस्थित होते.