| सांगली समाचार वृत्त |
सातारा - दि. २० एप्रिल २०२५
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार असल्याच्या चर्चांनी महाराष्ट्राच्या राजकारणात नवा रंग भरला आहे. हे दोघं एकत्र आले, तर राज्यासाठी ते सकारात्मक ठरू शकतं, अशी प्रतिक्रिया अनेक विरोधी नेत्यांनी दिली आहे. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील काही नेत्यांनी ही युती शक्य नसल्याचं भाकीत वर्तवलं आहे.
दरम्यान, या चर्चांवर आता खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया देताना आपला संताप व्यक्त केला. सध्या शिंदे आपल्या मूळ गावी, साताऱ्याजवळील दरेगाव येथे आहेत.
राज ठाकरे काय म्हणाले?
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखतीत विचारलं गेलं की, "उद्धव ठाकरे आणि आपण पुन्हा एकत्र येणार का?" त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, “आमचं भांडण फारसं मोठं नाही. महाराष्ट्र मोठा आहे,” असं सूचक वक्तव्य करत एकत्र येण्याची शक्यता दर्शवली.
या विधानानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं सकारात्मक प्रतिसाद दिला. खासदार संजय राऊत म्हणाले, "या प्रतिक्रियेकडे दुर्लक्ष करणं ही चूक ठरेल."
उद्धव ठाकरेंची भूमिका काय?
उद्धव ठाकरे यांनीही युतीच्या शक्यतेबाबत सकारात्मक संकेत दिले. “मी कुणासोबत भांडलो नव्हतो. मी जुनी भांडणं विसरण्यास तयार आहे,” असं सांगत त्यांनी काही अटींचा उल्लेख केला – "महाराष्ट्रद्रोह्यांशी सहकार्य नको, त्यांच्या प्रचारापासून दूर राहा," असे ठाम निकष त्यांनी स्पष्ट केले.
शिंदेंचा संतप्त प्रतिसाद
राज-उद्धव युतीच्या चर्चांवर माध्यमांनी विचारणा केल्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे चांगलेच भडकले. “तू कामाचं बोल. तुम्हाला दुसरं काही दिसत नाही का? राजकारण म्हणजे रोजची गोष्ट आहे,” असा संतप्त प्रतिसाद देत त्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं.