yuva MAharashtra मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा अखेर भारतात; एनआयएकडून चौकशी सुरू

मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहव्वूर राणा अखेर भारतात; एनआयएकडून चौकशी सुरू

फोटो सौजन्य : गुगल फोटो गॅलरी

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ११ एप्रिल २०२५

२६/११ च्या मुंबईवरील भयावह दहशतवादी हल्ल्याच्या कटात सहभागी असलेल्या तहव्वूर राणाला अखेर भारतात आणण्यात आले आहे. एनआयएचे वरिष्ठ अधिकारी बत्रा यांच्या नेतृत्वाखालील खास पथकाने त्याला भारतात आणले असून, आता त्याची चौकशी थेट एनआयएच्या मुख्यालयात होणार आहे.

तहव्वूर राणाला २००९ मध्ये अमेरिकेत अटक झाली होती. तेव्हापासून त्याच्याविरोधात न्यायप्रक्रिया सुरू होती. अमेरिकन न्यायालयाने जे कलम मान्य केले आहेत, त्याच आधारे भारतात त्याच्यावर खटला चालवला जाणार आहे. यावर राणाने “माझ्यावर अमेरिकेतच खटला झाला, मग पुन्हा भारतात का?” असा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र भारत सरकारने आंतरराष्ट्रीय कायद्यांचा दाखला देत त्याचा युक्तिवाद फेटाळला. तसेच, राणावरील गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने भारतात खटला चालवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचं भारताने अमेरिकन न्यायालयात ठासून सांगितलं.

तहव्वूर राणाच्या भारतातील प्रत्यार्पणावर इस्रायलने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. भारताच्या दहशतवादविरोधी प्रयत्नांचे कौतुक करत, इस्रायलचे भारतातील राजदूत रुवेन अझर यांनी भारत सरकारच्या प्रयत्नांना सलाम केला आहे.


दरम्यान, पाकिस्तानने राणावर आपला संबंध नाही असे स्पष्ट करत स्वतःची पाठ झटकलेली दिसते. “राणा हा आता पाकिस्तानचा नागरिक नाही,” असे पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले असून, त्याने गेल्या दोन दशकांत पाकिस्तानशी संबंधित कोणतेही दस्तऐवज अद्ययावत केले नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे. मात्र कायदेतज्ज्ञांचे म्हणणे आहे की राणाच्या चौकशीतून पाकिस्तानची भूमिका उघडकीस येण्याची शक्यता आहे.

शहीद पोलीस अधिकारी तुकाराम ओंबळेंचे बंधू, एकनाथ ओंबळे यांनी राणाला आझाद मैदानात जनतेसमोर फाशी देण्याची मागणी केली आहे. “कसाबला फाशी देण्यास उशीर झाला, पण या वेळी तशी चूक होऊ नये,” अशी भावनिक मागणीही त्यांनी केली.

१९६१ मध्ये पाकिस्तानमध्ये जन्मलेला तहव्वूर राणा याने सुरुवातीला पाकिस्तानी लष्करामध्ये डॉक्टर म्हणून सेवा दिली. नंतर तो कॅनडामध्ये स्थायिक झाला आणि नंतर अमेरिकेतील शिकागो येथे विविध व्यवसाय, विशेषतः इमिग्रेशन कन्सल्टंसी, चालवत होता.

२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या भीषण हल्ल्यात १६० पेक्षा अधिक लोकांनी आपले प्राण गमावले होते. याच प्रकरणात राणा दोषी असल्याचे आरोप आहेत. तसेच डॅनिश वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या वादग्रस्त व्यंगचित्रांवर झालेल्या हल्ल्याच्या कटातही त्याची भूमिका असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर १२ गंभीर आरोप आहेत, ज्यात अमेरिकन नागरिकांच्या हत्येचे समर्थन आणि दहशतवादास प्रोत्साहन देणे हे समाविष्ट आहे.