| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ११ एप्रिल २०२५
सांगली लोकसभा मतदारसंघात विजयी झालेले अपक्ष खासदार विशाल पाटील हे काँग्रेसचे शंभरावे खासदार असल्याचे सांगितले जाते. पण भविष्यात आपण काँग्रेस नाही तर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाऊ असे म्हटल्याने सांगलीचे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, त्यांच्या वक्तव्याने कॉंग्रेसमध्ये खळबळ माजली आहे.
अवघ्या महिन्याभरापूर्वीच सांगलीचे पालकमंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते ना. चंद्रकांतदादा पाटील यांनी एका कार्यक्रमात "खा. विशाल पाटील भाजपमध्ये आल्यास योग्य तो सन्मान करु" अशी खुली ऑफर दिली होती. पण त्याच व्यासपीठावरून खा. पाटील यांनी ही ऑफर स्पष्ट शब्दांत नाकारली होती.
सांगली लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीत फूट पडली होती. विशाल पाटील यांच्यासाठी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी आ. विश्वजित पाटील यांच्यासह, महाविकास आघाडी म्हणून चंद्रहार पाटील यांच्या स्टेजवर हजेरी लावली. परंतु, आतून विशाल पाटील यांच्यासाठी जिवाचे रान केले. घडले तसेच, चंद्रहार पाटील यांचा पराभव झाला आणि विशाल पाटील निवडून आले. एकप्रकारे 'सांगलीचे वाघ आम्हीच आहोत,' असे विश्वजित कदम आणि विशाल पाटील यांनी दाखवून दिले होते. या दरम्यान त्यांच्या विरोधात ना कॉंग्रेस श्रेष्ठींनी कारवाई केली होती, ना कॉंग्रेसच्या राज्य नेतृत्वाने.
मात्र आता विशाल पाटील यांनी काँग्रेसलाच कात्रजचा घाट दाखवण्याचे संकेत दिले आहेत. महाराष्ट्र राज्य डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या अधिवेशनाचे उद्घाटन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे हस्ते पार पडले. यावेळी विशाल पाटील उपस्थित होते.
काय म्हणाले विशाल पाटील ?
विशाल पाटील म्हणाले, "मंत्री जयकुमार गोरे हे सांगलीचे जावई आहेत. आमच्यावर शेजारी गोरेंची सासरवाडी आहे. गोरे पण प्रथम अपक्ष आमदार म्हणून निवडून आले. मी पण प्रथमच अपक्ष खासदार म्हणून निवडून आलोय. भविष्यात मी काँग्रेससोबत नाहीतर दुसऱ्या कोणत्या तरी पक्षात जाईल. जसे गोरेंना मंत्रिपद भेटले तसे मला देखील पुढे जाऊन मंत्रिपद मिळेल, अशी आशा आहे. आम्ही पण पुढे जावे, अशी आशा आहे.
मिश्किल स्वभाव आणि वाकबॉम्ब!
खा. विशाल पाटील हे जाहीर कार्यक्रमात असे वाकबॉम्ब टाकण्यात वाकबगार आहेत... मध्यंतरी विधानसभा निवडणुक दरम्यान आ. सुहास बाबर यांच्याबाबत असेच खळबळजनक वक्तव्य केले होते. तर कवठे महांकाळ येथील जाहीर सभेत अशीच खळबळ उडवून दिली होती. नंतर या दोन्ही ठिकाणच्या वक्तव्यावरून घुमजाव केले होते.
त्यामुळेच कालच्या त्यांच्या वक्तव्यावरून जिल्ह्यात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. खरंच खा. विशाल पाटील 'कॉंग्रेसचा हात' सोडणार का ? आणि सोडलाच तर ते भाजपसोबत जातील की अजित पवार यांच्यासोबत ? असाही प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. कारण त्यांच्या काकी श्रीमती जयश्रीताई पाटील कॉंग्रेस मधून निलंबित झाल्यानंतर त्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यक्रमात व्यासपीठावर दिसू लागल्या आहेत. त्यामुळेच खा. विशाल पाटील हे ही त्यांच्यापाठोपाठ अजित पवार यांच्या गोटात सामील होऊन केंद्रात अजित पवार वाट्याचे मंत्रिपद मिळवू शकतात, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.
पण सध्या उठलेले राजकीय चर्चेचे वादळ खा. विशाल पाटील यांचे याबाबत 'पुनश्च घुमजाव' वक्तव्यानंतर पेल्यातील ठरते ? की खरंच खा. विशाल पाटील आपल्या वक्तव्यावर ठाम राहून 'पुढचे पाऊल' उचलतात, हे येणारा काळच ठरवेल.