yuva MAharashtra शिक्षकांनी लिहिला सांगली जिल्ह्याचा गौरवशाली इतिहास – ७०० गावांसाठी २२६३ शैक्षणिक धडे तयार !

शिक्षकांनी लिहिला सांगली जिल्ह्याचा गौरवशाली इतिहास – ७०० गावांसाठी २२६३ शैक्षणिक धडे तयार !


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १० एप्रिल २०२५

सांगली जिल्ह्यातील ७०० हून अधिक गावांची समृद्ध माहिती आता शैक्षणिक धड्यांच्या स्वरूपात उपलब्ध झाली आहे. जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांनी ‘माझ्या गावचा धडा’ या उपक्रमाअंतर्गत तब्बल २२६३ धडे तयार केले असून, या अनोख्या शैक्षणिक प्रकल्पाचे एकत्रित प्रकाशन नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी जिल्हाधिकारी अशोक काकडे, मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, पोलिस अधीक्षक संदीप घुगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निखिल ओसवाल, प्रकल्प संचालिका नंदिनी घाणेकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या संकल्पनेतून जन्माला आलेल्या या उपक्रमामुळे जिल्ह्यातील शिक्षक लेखनात सक्रीय झाले. तालुकानिहाय धड्यांची संख्या पुढीलप्रमाणे आहे: शिराळा १४७, वाळवा ८५, खानापूर ८६, मिरज १२७, जत मराठी २५६ व कन्नड ११२, कडेगाव ९६, पलूस ६५, आटपाडी ८७, कवठेमंकाळ ८० आणि तासगाव १०२. प्रत्येक तालुक्याच्या ८० व केंद्रस्तरावरील २० अशा एकूण १०० पुस्तिका तयार करण्यात आल्या आहेत. जत तालुक्यात कन्नड माध्यमातील दोन स्वतंत्र पुस्तिकाही तयार करण्यात आल्या असून, तासगाव नगरपरिषदेकडून विशेष पुस्तक देखील तयार झाले आहे.

या उपक्रमासाठी डॉ. विमल माने, स्वाती शिंदे, बाबा परीट, गौतम कांबळे, दयासागर बन्ने, कृष्णात पाटोळे, संदीप पाटील, दीपक रोकडे, वैशाली आडमुठे, सुषमा डांगे, अर्जुन जाधव, अवधूत भोसले, दीपक माळी, नितांत तांबडे, नीलेश कांबळे, तारीश आत्तार, महादेव देसाई, रमेश तिके, कपिल कांबळे, राजू केंगार यांसह अनेकांनी मेहनत घेतली. सहायक प्रशासन अधिकारी स्वप्नाली माने आणि त्यांच्या टीमने पुस्तकांचे सुंदर प्रदर्शन साकारले.

तालुकास्तरावर समन्वयक म्हणून आबासाहेब लावंड, प्रमोद गोफणे, राम फरकांडे, तेजस्विनी पवार, विकास राजे, पोपट मलगुंडे, अजिंक्य कुंभार, सिद्धराय्या चिखलगी, ज्ञानेश्वर चिमटे, जगन्नाथ कोळपे यांनी मोलाचे योगदान दिले.

इतिहास आणि भूगोलाचे शब्दांकन

‘माझ्या गावचा धडा’ उपक्रमामुळे गावांचा ऐतिहासिक आणि भौगोलिक वारसा लेखबद्ध झाला आहे. अनेक गावांबाबतची माहिती प्रथमच दस्तऐवजीकरणाच्या रूपात समोर आली आहे. या धड्यांमध्ये गावातील प्राचीन वास्तू, स्मारके, विकासाची वाटचाल आणि गावाचे वैभव वाढवणाऱ्या महान व्यक्तींचा गौरव करण्यात आला आहे.