Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभा निवडणूक निकालात 'इंडिया' आघाडीला लॉटरी लागण्यामागची 5 कारणं !



| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ५ जून २०२४
लोकसभा निवडणुकीच्या आतापर्यंतच्या कलांमध्ये एनडीएला बहुमत मिळालं आहे. मात्र विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीकडून जबरदस्त टक्कर मिळत आहे. भाजपच्या 'अबकी बार 400 पार'च्या घोषणेचा काही विशेष परिणाम पडला नसल्याचं दिसून येत आहे. ममता बॅनर्जी दूर गेल्यामुळे आणि नितीश कुमार हे एनडीएमध्ये गेल्यामुळे इंडिया आघाडी कमकुवत ठरतेय, असं चित्र दिसत होतं. मात्र निवडणुकीत त्यांची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली दिसून आली. मोदी सरकारविरोधी लोकांमध्ये जो काही असंतोष होता, त्याचा संपूर्ण फायदा विरोधी आघाडीला झाल्याचं पहायला मिळतंय. यासाठी आणखी कोणती पाच कारणं महत्त्वाची ठरली, ते पाहुयात..

1- निवडणुकीचा प्रचार
लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना दोन्ही बाजूंनी कस लावला होता. मात्र आरक्षण संपवण्याच्या आणि संविधान बदलण्याच्या गोष्टींना मुद्दा बनवण्यात विरोधी पक्षांना यश मिळाल्याचं दिसून येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही विरोधी पक्षाच्या मुद्द्यांना आपल्या अंदाजात उत्तर देण्याचा प्रयत्न केला. ‘जास्त मुलं जन्माला घालणारे’, ‘घुसखोर’, ‘मंगळसूत्र’ यांसारखे राजकीय की-वर्ड लोकांना फारसे पसंत पडले नाहीत.

2- स्थानिक पक्षांच्या दबदब्याचा परिणाम
निवडणुकीच्या आधी एका सर्वेक्षणात असं म्हटलं गेलं होतं की भाजपला स्थानिक पक्षांकडून कठोर आव्हान मिळू शकतं आणि देशभरात अशा 200 हून अधिक जागा सांगितल्या गेल्या होत्या. सध्या निकालाच्या कलांमध्येही हेच चित्र दिसून येत आहे. स्थानिक पक्षांमध्ये सर्वाधिक प्रभावी हे उत्तरप्रदेशमधील अखिलेश यादव यांची समाजवादी पार्टी, तमिळनाडूमध्ये डीएमके आणि पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आहे. बिहारमध्ये तेजस्वी यादव यांच्या आरजेडीचं प्रदर्शन तसा ठरला नाही. मात्र महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंची शिवसेना पुन्हा मजबूत होत असल्याचं दिसतंय.


3- मुस्लीम मतदार इंडिया आघाडीसोबत
एक्झिट पोलमध्ये समोर आलेले आकडे आता जरी निकालाच्या कलांशी मिळतेजुळते दिसत नसले तरी, मुस्लीम मतदारांशी संबंधित सर्वेक्षण योग्य ठरतंय. इंडिया आघाडीला सर्वाधित मतं ही मुस्लीम समुदायाकडून मिळाली आहेत, हे स्पष्ट होतंय.

4- तरुण मतदार
एक्झिट पोलमध्ये तरुणांचा विशेष उल्लेख करण्यात आला होता. तर भाजपाचे अधिक मतदार हे 35 हून अधिक वर्षांच्या वयोगटातील आहेत. 18 ते 25 आणि 25 ते 35 वयोगटातील मतदारांना बदल आणि त्वरित परिणाम अपेक्षित होता. त्यांचं मत इंडिया आघाडीला मिळाल्याची शक्यता आहे.

5- काँग्रेसच्या कामगिरीत सुधारणा
काँग्रेसची न्याय स्कीम यावेळी कामी आली, असं म्हणायला हरकत नाही. न्याय योजना तर राहुल गांधींनी 2019 मध्ये पण आणली होती, मात्र त्याचं महत्त्व ते नीट समजावू शकले नव्हते. यावेळी त्यांनी त्यात आणखी काही गोष्टी जोडल्या आणि त्याचाच फायदा झाला.