Sangli Samachar

The Janshakti News

आपला मधला वेळ आणि त्यावरचं मनन...



परवा एका मित्राशी पादचारी दिनानिमित्त लक्ष्मी रोडवर जो No vehicle zone केला होता, याबाबत चर्चा करत होतो. एकूणच सगळी मुलं मोठी माणसं सगळेच कसे enjoy करत होते, हे तो सांगत होता आणि मध्येच म्हणाला की, तुला माहितीये का, त्या LIC च्या बिल्डींगच्या इथे तो एक जुना बोर्ड आहे आणि खूप जुना आहे. आपण एवढ्या वेळा जातो त्या रस्त्यावरून मला पुण्यात येऊन ६/७ वर्ष झाली, पण मी तो आज पाहिला. मला कळलं नाही की, हा असं का सांगतोय? बोर्ड आहे जुना, तो पहिला त्यात काय ते एवढं? तर तो म्हणाला की, मी आज battery low असल्याने माझा फोन घरी charging ला लावून मग बाहेर पडलो. आणि या बोर्डसारख्या अजूनही काही गोष्टी मला जाणवल्या. कारण इतके दिवस आधी मी कधी त्या इतक्या clearly पाहिल्याच नव्हत्या. 

फोन नसल्याने माझं लक्ष गेलं आणि मी ते notice करू शकलो. त्याच्याशी बोलताना माझ्या असं लक्षात आलं की, आपण फोनमध्ये इतके अडकून गेलोय की, निरीक्षण हा घटकच नाहीसा झाला आहे. त्यामुळे आपण सारखं स्वतःला मी किती busy आहे हे सांगत राहतो. नाही हो वेळच होत नाही इतकं सुरू असतं ना, दिवसभर काय काय. काय सांगू तुम्हाला? पण खरंच असं असतं का ? अगदी दोन मिनिटं सुद्धा रिकामी मिळत नाहीत का? आणि जेव्हा मिळतात त्यात आपण काय करतो? बऱ्याचदा फोन हातात घेऊन social networking sites, games, photos, videos, कधी कधी तर अगदी नुसतं wallpaper बघत असतो. 

पण पूर्वी म्हणजे साधारण १५-२० वर्षापूर्वीचा काळ डोळ्यासमोर आणा. त्याकाळी हा फोन नव्हता. तेव्हा लोक काय करत असतील? त्याकाळी लोकांकडे वेळही असायचा हे वाक्य तर आपण इतक्या वेळा ऐकतो. पण तो दोन गोष्टींच्या मधला वेळ त्यांना कसा मिळायचा? तर हा मधला वेळ म्हणजे बस स्टॉप वर उभा असताना बस येईपर्यंतचा, Hotel मध्ये order येईपर्यंतचा, भेटीच्या ठिकाणी समोरचा माणूस येईपर्यंतचा, भात शिजेपर्यंतचा, कॉलेजात शिक्षक येईपर्यंतचा, टीव्हीवर एखादा Program संपुन दुसरा सुरू होईपर्यंतचा किंवा डॉक्टरांच्या waiting room मध्ये आपल्या नंबराची वाट बघेपर्यंतचा वगैरे वगैरे…. हा जो काही मधला वेळ आपल्याला मिळायचा त्यात आपण फोन नसताना काय करायचो?

खूप विचारांती माझ्या असं लक्षात आलं की, साधारण आपण दिवसभरात जी कामं करणार असू त्याचा विचार, घरात कोण काय बोललं, त्यावरून कोणाला काय हवंय याचा विचार, मध्येच एखाद्या जुन्या मित्राची किंवा मैत्रिणीची आठवण येऊन तिचं काय चाललं असेल ती ख्यालीखुशाली पत्र लिहून विचारली पाहिजे अशी एक आठवण, आपल्या हातून एखादी चूक घडली असेल तर कारणमीमांसा करून चूक सुधारण्यासाठी process, अर्थिक गणिताची जुळवाजुळव, घरगुती कार्यक्रमाचे नियोजन, वर्तमानपत्र, मासिक वाचणं/चाळणं, गॅलरीत उभं राहून झाडं पक्षी बघणं, आजूबाजूला असणारी वेगवेगळ्या प्रकारची माणसं, त्यांचा पेहराव, सामान, गाड्यांचं निरीक्षण आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्वसंवाद…. म्हणजे या सगळ्या आजूबाजूला दिसणाऱ्या घटनांवर आपल्या मनात उमटणारे प्रतिसाद…..अशा असंख्य गोष्टी मुकेपणाने त्या एकट्याच्या मधल्या वेळेत चालत असायच्या.. पण आज Online, Quick, Instant या सगळ्याच्या नादात आपण हा मधला वेळ हरवून बसलोय का ? म्हणजे आवडतात म्हणून आणि इच्छा झाली म्हणून आपण गाणी ऐकतो की सवय म्हणून पटकन headphones लावून गाणी आपोआप चालू केली जातात ? गरज आहे म्हणून आपण मोबाईल बाहेर काढतो की आपोआप तो बाहेर येतोच आणि आपसूक सवयीने FB, Insta check केलं जातं ? 

काहीच नवीन नसेल तर हा Group open कर, त्याचं Profile check, हा इकडे गेला होता, बरंय यांना बऱ्या मिळतात रजा फिरायला वगैरे विचार करत राहतो… आणि या सगळ्यांपेक्षा महत्वाचा प्रश्न असा की त्यातून आपल्याला काय मिळतं??? लोकांचे प्रोफाईल check करणं, तासनतास reels बघत बसणं, नुसतं उभं राहिलं की फोन काढून unlock करून messages, phones आले आहेत का चेक करणं, यातून आपला मधला वेळ आणि त्यावरचं मनन, मात्र निसटून चाललंय आणि आपल्या ते लक्षातही येत नाहीये. त्यामुळे उघडा डोळे बघा नीट. कामाच्या मधल्या 5/10 मिनिटात फोन न बघण्याचा प्रयत्न करा. आजूबाजूला असणाऱ्या गोष्टींचं निरीक्षण करा. एखाद्या collegue ला compliment द्या. उगाचच signal वर थांबलेल्या गाडीवरच्या माणसांकडे बघा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला वेळ नाहीये. वेळ नाहीये हे स्वतःला आणि इतरांना ऐकवण्याआधी कटाक्षाने मी माझा मधला वेळ किती आणि कुठे घालवतोय हे पहा. मग वेळ कधी कुठे कसा जातोय.. याचा प्रश्न पडणार नाही….