Sangli Samachar

The Janshakti News

तो पुढे पळत होता. मागून लोक दगडाचा मारा करत होते; भाजप उमेदवारावर 'या' राज्यात हल्ला !



| सांगली समाचार वृत्त |
कोलकत्ता - दि. २६ मे २०२४
लोकसभेचा सहाव्या टप्प्याचे मतदान शनिवारी पार पडले. पश्चिम बंगालच्या आठ लोकसभा जागांवर आज मतदान झाले. या दरम्यान, एक विचित्र घटना घडली. झारग्राम येथील मोंगलापोटा येथे भाजपा नेता आणि झारग्रामचे उमेदवार प्रणत टुडू ( Pranat Tudu ) यांच्या जमावाने हल्ला केला. 

त्यांच्यावर अक्षरश: दगडफेक झाली. या घटनेचा एक व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. यात भाजपा उमेदवार ( BJP candidate ) जीव तोडून धावताना दिसत आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या पोलिसांना त्यांना कसे बसे या जमावाच्या तावडीतून वाचविल्याने पुढील अनर्थ टळल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणात भाजपा उमेदवार नेते प्रणत टुडू यांनी ममता सरकारवर गंभीर आरोप केला आहे.


पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील गरबेटा परिसरात आपल्या ताफ्यावर हल्ला झाल्याचे भाजपा नेते प्रणत टुडू यांनी दावा केला आहे. त्यामुळे त्यांना वाचविताना त्यांचे सुरक्षा कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यामुळे त्यांना रुग्णालयात भरती करावे लागले आहे. काही मतदान केंद्रांवर भाजपाच्या एजंटना प्रवेश नाकारल्याची तक्रारी आल्यानंतर प्रणत त्याची खातरजमा करण्यासाठी गारबेटा येथे जात होते. त्यावेळी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांची मोठी कुमक बोलाविण्यात आली. त्यानंतर टीएमसीच्या गुंडांनी माझ्या कारवर अचानक दगडफेक करायला सुरुवात केली आणि रस्ता संपूर्णपण ब्लॉक केला. जेव्हा माझ्या सुरक्षा रक्षकांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला तेव्हा ते त्यांच्यावर तुटून पडले. त्यात ते प्रचंड जखमी झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे भाजपा उमेदवार प्रणत यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला सांगितले. आपल्या सोबतच्या सीआयएसएफच्या दोन जवानांची डोकी फुटली आहेत, त्यांना रुग्णालयात भरती केल्याचे प्रणत टुडू यांनी सांगितले.

टीएमसीने आरोप फेटाळले

ममता बॅनर्जी यांचा पक्ष टीएमसीने या सर्व आरोपांचा इन्कार केला आहे. शांततेत सुरु असलेली मतदान प्रक्रिया टुडू यांनी भंग केल्याचा आरोप टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. भाजपाचा उमेदवार मतदारांना धमकी देत होता. त्यामुळे गावकरी भडकले आणि त्यांनी आपला विरोध केला.

सायं. 5 वाजेपर्यंत 77.99% मतदान

पश्चिम बंगालमध्ये सहाव्या टप्प्यात 8 लोकसभाजागांवर सायंकाळी 5 वाजेपर्यंतच्या आकडेवारीप्रमाणे 77.99 टक्के मतदान झाले आहे. तमलुक, कांथी, घाटल, झाडग्राम, मेदिनीपूर, पूरुलिया, बांकुरा आणि बिष्णुपूर मतदार संघ क्षेत्रात सकाळी 7 वाजता मतदान सुरु झाले. बिष्णुपूरमध्ये सर्वाधिक 81.47 टक्के मतदान झाले तर तमलुक मध्ये 79.79 टक्के, झारग्राममध्ये 79.68 टक्के, घाटलमध्ये 78.92 टक्के, मेदिनीपुरात 77.57 टक्के, बांकुरात 76.79 टक्के, कांथीमध्ये 75.66 टक्के आणि पुरुलियात 74.09 टक्के मतदान झाले.

79 उमेदवारांचे भविष्य

सायं 4 वाजेपर्यंत पश्चिम बंगाल निवडणूक कार्यालयाला 1,985 तक्रारी आल्या, या 8 जागांवर 79 उमेदवार आपले नशिब आजमावित आहेत. बांकुरा आणि झाडग्राम सर्वाधिक प्रत्येकी 13-13 उमेदवार उभे आहेत, पुरुलियात 12 तसेच मेदिनीपुर आणि तमलुकमध्ये प्रत्येकी 9-9 उमेदवार उभे आहेत. बिष्णुपुर आणि घाटल मतदार संघात प्रत्येकी सात उमेदवार उभे आहेत.