Sangli Samachar

The Janshakti News

लोकसभेच्या निवडणुकीनंतर एक तर विद्रोह अन्यथा... - अशोक वानखेडे



| सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. १३ मे २०२४
अठराव्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजपामध्ये एक तर विद्रोह होईल किंवा मग.. पंतप्रधान झालेले मोदी व भाजपाचे मास्टरमाइईंड अमित शाहा पुन्हा एकदा 'इडी सीबीआय' या यंत्रणांना हाताशी धरून आपले सिंहासन भक्कम करतील. असे परखड मत राजकीय विश्लेषक, जेष्ठ पत्रकार, ऑल इंडिया जनरलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले.

'जनप्रवास लाईव्ह' या कार्यक्रमात संपादक व ज्येष्ठ पत्रकार संजय भोकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीदरम्यान ते बोलत होते. यावेळी त्यांनी भाजपला 180 ते 230 च्या दरम्यान जागा मिळतील असे सोदाहरण पटवून दिले. 
यावेळी बोलताना वानखेडे पुढे म्हणाले की, आतापर्यंत भाजपा वाढवण्यासाठी ज्यांनी आपलं आयुष्य घालवलं, त्यांना बाजूला करण्यात येऊन सत्तेसाठी आयारामांना संधी दिली. तेव्हा अशा नेत्यांची, त्यांच्या कार्यकर्त्यांची व भाजपाप्रेमी जनतेची काय मानसिकता झाली असेल ? वसुंधरा राजे यांची तर तिसरी पिढी भाजपासाठी खपली आहे. पण काय झाले ? असा सवाल करून वानखेडे यांनी म्हटले की ,या साऱ्यांनी भाजपच्या मागून कशासाठी यावे ?


या साऱ्या पार्श्वभूमीवर जर अपेक्षित यश मिळाले नाही तर या नेतृत्वाविरुद्ध उठाव होऊन भाजपामध्ये नवीन नेतृत्व उदयास येईल व त्याच्या पाठीमागे नवी एनडीए ताकतीने उभी राहील आणि देशाला स्थिर सरकार मिळेल.

भाजपामध्ये मोदी हे एक नंबरचे नेतृत्व असल्याचे मानले जाते. परंतु ते अर्धसत्य आहे. खरे एक नंबरचे नेतृत्व हे अमित शाहा आहेत. सत्ता आणि संघटन हे दोन्हीही त्यांच्याच हातात आहे. असेही वानखेडे यांनी सांगितले. "दिल्लीत नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र" हा फॅक्टर मागे का पडला ? असा सवाल करून वानखेडे म्हणाले की, ज्यावेळी देवेंद्र फडणवीस डोईजड होत आहेत असे वाटले, तेव्हा त्यांच्या पाठीमागे तावडे यांचे ग्रहण लावले. देवेंद्र फडणवीस यांना मोठे का केले ? तर नितीन गडकरी यांचे प्रस्थ वाढत होते. ही काँग्रेसची नीती 'मोदी शाहा' यांनी अवलंबलेली आहे. राहुल गांधी यांच्या मते काँग्रेस प्रमाणेच भाजपा तडजोडीच्या राजकारणात रसातळाला गेली आहे. असेही अशोक गायकवाड यांनी म्हटले.