Sangli Samachar

The Janshakti News

शाळकरी विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमातून इंग्रजी विषय शिथिल? शिक्षण आराखड्यात नेमकं काय म्हटलंय ?



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २४ मे २०२४
भारतासह अन्य काही देशांमध्ये महत्त्वाती भाषा मानल्या जाणाऱ्या इंग्रजीचे विषयाचे अभ्यासक्रमातील बंधन शिथिल करण्यात आले आहेत. सध्या इयत्ता पहिली ते १२ वी पर्यंत इंग्रजी विषयाचे शिक्षण अनिवार्य आहे. मात्र यापुढे आता इयत्ता ११वी आणि १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषयाची सक्ती नसणार, असे महाराष्ट्र राज्याच्या नव्याने लागू केलेल्या अभ्यासक्रमातील आराखड्यातून समोर आले आहे. मात्र शालेय म्हणजे इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत इंग्रजी भाषेचे नेमके स्थान काय असेल याबाबत अनेक प्रश्न पडले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगाने आज दिनांक २३ मे रोजी राज्याचा अभ्यासक्रम आराखडा जाहीर करण्यात आलाय. मात्र या अभ्यासक्रमाच्या संबंधित आराखड्यावर २३ मे ते ३ जूनपर्यंत सूचना आणि आक्षेप नोंदवता येणार असल्याचे समजते. या जाहीर केलेल्या आराखड्यानुसार, मातृभाषा आणि भारतीय भाषांना विषेश महत्त्व देण्यात आल्याचे दिसून येते.

सोबतच विद्यार्थ्यांना परदेशी भाषा शिक्षणाचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात यावा अशा सूचना देण्यात आली आहे. मात्र इयत्ता १ली पासूनच्या विद्यार्थांना पहिलीपासून इंग्रजी आणि मातृभाषेचे शिक्षण बंधनकारक आहे. परंतू शिक्षण आराखड्यात दुसरी भाषा इंग्रजीच असावी अशी कोणतीही अट घातलेली नाही. दुसरी भाषा ही पहिल्या भाषेव्यतिरिक्त कोणतीही अन्य भाषा असावी असे नमूद केले आहे. आपल्या इथे इयत्ता सहावी ते दहावीपर्यंत विद्यार्थ्यांना हिंदी, मराठी आणि इंग्रजी या भाषेचे सूत्र आहे. मात्र विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना मातृभाषा , इंग्रजी आणि तिसरी पर्यायी भाषा अशी रचना आहे. मात्र दिलेल्या प्रस्तावित आराखड्यात पहिली भाषाही मातृभाषा, दुसरी कोणतीही भारतीय भाषा असावी आणि तिसरी कोणतही परदेषी भाषा असावी असे नमूद करण्यात आले आहे. इंग्रजी भाषा ही परदेशी भाषेत येत असल्याने विद्यार्थ्यांना ही शिकण्याची मुभा असेल मात्र त्याच्यासाठी बंधनकारक नसेल.


आराखड्यातील तरतुदींनुसार, इंग्रजी भाषा पर्यायी भाषा म्हणून निवडता येऊ शकले असे दिसते. मात्र हीच इंग्रजी भाषा विद्यार्थ्यांसाठी अनिवार्य असेल की नाही याबाबत कोणताही स्पष्ट उल्लेख या तरतुदींमध्ये केला नाही. अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना दोन भाषा शिकणे अपरिहार्य आहे त्यातील एक भारतीय भाषा तर दुसरी परदेशी किंवा अजून एक भारतीय भाषा शिकता येईल. पण सध्या बारावीला असलेले इंग्रजी विषयाचे बंधन काढून टाकण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांसाठी भाषेचे पर्याय कोणते ?

भारतीय भाषा- विद्यार्थ्यांसाठी भारतीय भाषेत मराठी, संस्कृत, हिंदी, कन्नड म, गुजराती, ऊर्दू, तामिळ, तेलगू, मल्याळम, सिंधी, बंगाली, पंजाबी आणि पाली, अर्धगामी, प्राकृत, अवेस्ता पहलावी असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. तर परदेशी भाषा - इंग्रजी, जर्मन, फ्रेंच, रशियन , जपानी, स्पॅनिश, चायनीच, पर्शियन आणि अरेबिक हे परदेशी भाषांचे पर्याय उपलब्ध आहेत.