Sangli Samachar

The Janshakti News

भारताने चीनचे टेन्शन वाढवलं या क्षेत्रात केली जबरदस्त चढाई !



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ९ मे २०२४
कोरोना महामारीचा चीनच्या अर्थव्यवस्थेला जबरदस्त फटका बसला आहे. यानंतर भारताने चीनचे अधिपत्य असलेल्या अनेक व्यावसायिक क्षेत्रात आपला दबदबा निर्माण केला आहे. आता चीन आणखी एका क्षेत्रात भारताकडून मागे पडत चालला आहे. या क्षेत्रात कधीकाळी चीनचा जबरदस्त दबदबा होता. मात्र, गेल्या काही वर्षांत भारताची या क्षेत्रात घोडदौड सुरू आहे. हे क्षेत्र म्हणजे, टॉय मार्केट. भारतीय खेळण्यांची संपूर्ण जगात धूम बघायला मिळत आहे. भारतीय खेळणीची निर्यात वाढली असून चीनमधून होणारी आयात 70 टक्क्यांनी घटली आहे.

भारताचा दबदबा वाढतोय -

आर्थिक वर्ष 2015 ते 2023 दरम्यान भारतीय खेळणीच्या निर्यातीत तब्बल 239 टक्क्यांची वाढ झाली आहे. तर आयातीत 52 टक्क्यांची घट झाली आहे. महत्वाचे म्हणजे चीनमधून होणाऱ्या खेळण्यांच्या आयातीतही तब्बल 72 टक्क्यांनी घट झाली आहे. यावरून टॉय मार्केटमधील अथवा खेळणी बाजारातील भारताच्या वाढता दबदब्याचा अंदाज लावता येऊ शकतो.


वाढत्या खेळणी उद्योगामुळे भारत आता एक मोठा निर्यातदार म्हणून उदयास येत आहे. तर या उद्योगातील चीनचा दबदबा कमी होताना दिसत आहे. मार्केट रिसर्च फर्म IMARC नुसार, सध्या भारताचा खेळणी उद्योग 1.7 अब्ज डॉलरचा आहे. हा उद्योग 2032 पर्यंत 4.4 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकतो. भारत खेळणीच्या जगातील पॉवरहाऊस म्हणून उदयाला येत आहे.

भारतीय खेळण्यांना अधिक मागणी -

बिझनेस स्टँडर्डच्या एका वृत्तानुसार, भारतात खेळणी विकण्यासाठी बीआयएस अप्रूव्हल आवश्यक आहे. तर चीनच्या खेळणी बीआयएस मार्क नसतात. खेळणींची क्वालिटी बघता, हॅस्ब्रो, मॅटेल, स्पिन मास्टर आणि अर्ली लर्निंग सेंटर भारतातून खेळणी खरेदी करत आहेत. याशिवाय, ड्रीम प्लास्ट, मायक्रोप्लास्ट आणि इंकास, जे पूर्वी चीनकडून खेळणी खरेदी करत होते, ते आता भारताकडे वळवत आहेत. बीआयएस अनिवार्य होण्यापूर्वी, भारतामध्ये 80 टक्के खेळणी चिनी असत. मात्र, आता तसे नाही.