Sangli Samachar

The Janshakti News

मोबाईलवर बोलणं आणि इंटरनेट पडणार महागात



| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि.१४ एप्रिल २०२४ -
आज प्रत्येक घरात किमान 4 मोबाईल फोन आहेत. त्यामध्ये महिन्याला 200 रुपये प्रमाणे म्हंटले तर 800 रुपयांचे रिचार्ज करावे लागते. मात्र आता या खर्चात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण दूरसंचार कंपन्या वेगवेगळ्या मोबाइल सेवा योजनांचे दर वाढवणार आहेत. अँटिक स्टॉक ब्रोकिंगच्या अहवालानुसार, या वर्षी मोबाइल सेवा शुल्कात (सिम रिचार्ज) 15-17% वाढ होऊ शकते. त्याच वेळी, जिओ आणि एअरटेल त्यांच्या प्रीमियम वापरकर्त्यांना अमर्यादित डेटा देणे थांबवू शकतात.

अहवालातील माहितीनुसार, कंपन्या जून-जुलैपर्यंत दर वाढवण्याचा निर्णय घेऊ शकतात. काही इतर तज्ञांच्या मते मोबाईल फोन सेवा 20% महाग होतील. त्याच वेळी, 4G च्या तुलनेत 5G सेवेसाठी 5-10% अधिक शुल्क आकारले जाऊ शकते.

2-3 हप्त्यांमध्ये दर वाढ होऊ शकते

मार्केट शेअरच्या बाबतीत देशातील दुसरी सर्वात मोठी दूरसंचार कंपनी भारती एअरटेल, तीन वर्षांमध्ये ‘रेव्हेन्यू प्रति युजर’ (RPU) म्हणजेच प्रति वापरकर्ता सरासरी कमाई 208 रुपयांवरून 286 रुपये वाढवू इच्छिते. यासाठी कंपनी टॅरिफमध्ये सुमारे 55 रुपयांनी वाढ करू शकते. Jio यावर्षी सरासरी 15% नी दर वाढवू शकते.


गुंतवणुकीवर कमी परताव्याची भरपाई करण्याचा प्रयत्न –

बँक ऑफ अमेरिकाच्या म्हणण्यानुसार, भारतीय टेलिकॉम कंपन्यांनी 5G स्पेक्ट्रमवर मोठी रक्कम खर्च केली आहे. त्या तुलनेत, ROCE (रिटर्न ऑफ कॅपिटल एम्प्लॉयड), म्हणजेच खर्चाच्या प्रमाणात कमाई खूपच कमी आहे. अमर्यादित योजनांमुळे कंपन्यांचे उत्पन्न आतापर्यंत कमी राहिले आहे.

2021 मध्ये वाढले होते रिचार्जचे दर 

मोबाईल टॅरिफमध्ये (सिम रिचार्ज) शेवटची वाढ नोव्हेंबर 2021 मध्ये करण्यात आली होती. त्यावेळी व्होडाफोन आयडियाने सुमारे 20%, भारती एअरटेल आणि जिओने 25% दर वाढवले ​​होते. Cable.co.uk च्या रिपोर्टनुसार, भारतीयांना 1GB डेटासाठी सरासरी 13.34 रुपये मोजावे लागतात.

116 कोटींहून अधिक मोबाईल ग्राहक 

भारतातील दूरसंचार कंपन्यांची नोंद ठेवणारी संस्था भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) च्या फेब्रुवारी 2024 च्या आकडेवारीनुसार, जानेवारी 2024 च्या तुलनेत फेब्रुवारीमध्ये देशभरात 39,30,625 मोबाइल ग्राहकांची वाढ झाली आहे. जानेवारीमध्ये देशभरात 116.07 कोटी मोबाइल ग्राहक होते, तर फेब्रुवारीमध्ये त्यांची संख्या 116.46 कोटी झाली आहे.