Sangli Samachar

The Janshakti News

सांगली, भिवंडी सोडली वाऱ्यावर; महाराष्ट्रातले काँग्रेस नेते टार्गेटवर !



सांगली समाचार - दि. १० एप्रिल २०२४
मुंबई - महाराष्ट्रातली महाविकास आघाडी वाचवण्याच्या नादात महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेत्यांनी सांगली आणि भिवंडी सोडली वाऱ्यावर त्यामुळे आता हे नेते आधीच्या काँग्रेसच्या नेत्यांच्या टार्गेटवर आले आहेत.  

महाराष्ट्रात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीने 48 जागांचा फॉर्म्युला जाहीर केला, त्यामध्ये काँग्रेसला फार मोठा "त्याग" करावा लागला. ठाकरे पवारांपुढे महाराष्ट्रातले काँग्रेस नेते झुकल्याचे चित्र निर्माण झाले. आता नेमका हाच मुद्दा उचलून धरून,  महाराष्ट्रातल्या काँग्रेस नेतृत्वाला टार्गेट केले आहे. तिकडे सांगलीत विशाल पाटील यांनी अस्वस्थ होऊन सांगलीच्या मैदानात अपक्ष म्हणून करण्याची तयारी चालवली आहे. राज्य पातळीवरच्या काँग्रेस नेत्यांना काय निर्णय घ्यायचा तो ते घेवोत, पण सांगलीची जागा आम्ही लढवणारच अशा मन:स्थितीत विशाल पाटील आहेत. त्यामुळे एकीकडे महाविकास आघाडी टिकवण्यासाठी आपल्या हक्काच्या जागांचा काँग्रेसला "त्याग" करावा लागला, तर दुसरीकडे आपल्याच नेत्यांचा रोष सहन करावा लागला आहे.


त्यामुळे आता प्रत्यक्षात नसले तरी पडद्यामागून बंडखोरांना पाठबळ द्यायची भूमिका पक्षश्रेष्ठींना घ्यावी लागणार आहे. भविष्यात राज्यातील काँग्रेस अजून कमजोर होऊन द्यायचे नसेल तर आत्ता नाराज उमेदवारांच्या मागे उभे राहावे लागणार आहे. परिणामी इकडे आड तिकडे विहीर असे पक्षश्रेष्ठींचे गत झाली आहे. आणि म्हणूनच यापुढे काँग्रेस श्रेष्ठ काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.