Sangli Samachar

The Janshakti News

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सांगली जिल्ह्यातील द्राक्ष निर्यातीत घट



सांगली समाचार  - दि. २७  मार्च २०२४
सांगली - सांगली जिल्हा हा द्राक्षपंढरी म्हणून पूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातून परदेशात युरोप, चीन, रशिया, दुबई, सौदी अरेबिया या देशात प्रचंड मागणी आहे व गेल्या चार ते पाच वर्षांपासून द्राक्ष निर्यातीचा आलेख वाढत आहे. तासगाव, मिरज,खानापूर, कवठेमहांकाळ या तालुक्यातून युरोप व दुबईला पाठवली जाणारी निर्यातक्षम द्राक्षे तयार केली जातात, यावर्षी मात्र नैसर्गिक आपत्तीमुळे द्राक्ष उत्पादक संकटात सापडला आहे. त्यातूनही शेतकऱ्यांनी निर्यातक्षम द्राक्ष बागा चांगल्या पद्धतीने तयार केल्या आहेत.

जिल्ह्यातून यंदा आजपर्यंत ११४४ कंटेनरमधून १५ हजार ६४६ मेट्रिक टन द्राक्षाची निर्यात झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात द्राक्ष निर्यात करण्याचे प्रमाण कमी आहे. निर्यातक्षम द्राक्षाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून, अवकाळी पाऊस आणि रोगाच्या प्रादुर्भावामुळे यंदा द्राक्षाची निर्यात घटल्याची शक्यता असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.


जानेवारीच्या सुरुवातीपासून युरोपियन व इतर देशात निर्यातीस सुरुवात होते. जानेवारीपासून जिल्ह्यातील द्राक्ष युरोपियन देशातील विविध बाजारपेठेत पोहोचण्यास सुरुवात झाली. युरोपमध्ये ऑस्ट्रिया, कॅनडा, क्रोएशिया, डेन्मार्क, जर्मनी, आयर्लंड, इटली या देशात तर चीन, मलेशिया, कतार, ओमान, सिंगापूर या देशातून मागणी जास्त असते

आजपर्यंत निर्यात झालेले कंटेनर

देश - कंटेनर - वजन
ऑस्ट्रिया - ५ - ६९.१
कॅनडा - १९ - ३२४.१३ 
चीन - ६९ - १७१.३९
क्रोआशिया - १ - १३
डेन्मार्क - २१ - २६२.०८
जर्मनी - ८ - १०८.३
हाँगकाँग - ६ - ७६.५
आयर्लंड - ७ - ९७.४४
इटली - ५ - ६८.५२
कुवैत - १ - १८
मलेशिया - २१ - २७२.९
नेदरलँड - ४१५ - ५४७७.४७
नार्वे - ३६ - ४३२
ओमान - ७ - १३१.०६
कतार - १ - १३.२५
रोमानिया - ११ - १५०
रशियन फेडरेशन - १९ - ३६८.८६ .
सौदी अरेबिया - ८७ - १३४७.६८
सिंगापूर - ६ - ७०.९९
स्पेन - ८ - १०२.९६
तैवान - १ - १२.४८
थायलंड - ९ - ११५.२३
युनायटेड अरब अमिरतस - २४९ - ३५०५.७१
युनायटेड किंगडम - १०५ - १४३६.७३
== ११४४ १५६४६

मागील वर्षी १३१४ कंटेनरची परदेशात द्राक्षे निर्यात झाली होती. यंदाच्या हंगामात जिल्ह्यातील ९ हजार ६२७ द्राक्ष उत्पादकांची निर्यातीसाठी नोंदणी झाली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे व लहरी वातावरणामुळे यावर्षी विदेशात पाठविण्याच्या प्रतीची उत्तम द्राक्षे तयार झाली नाहीत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत द्राक्षाचे विक्रीदर पण कमी आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढला आहे; पण विक्रीकर कमी असल्याने शेतकऱ्यांचा निर्यात करण्याकडे कल कमी राहिला.