Sangli Samachar

The Janshakti News

भाजपचं नाव आता 'भ्रष्टाचार जुळवून घेणारी पार्टी' करावं - गोपाळ तिवारींचा टोला!

 


सांगली समाचार  - दि. १४|०२|२०२४

मुंबई  - 'सत्तेत असूनही भाजपला स्वतःच्या कर्तृत्वावर' मत मागणे अशक्य झाले आहे. तसेच पुन्हा निवडून येण्याच्या लालसे पोटी' विरोधीपक्ष कमजोर करण्याचे स्वार्थी व लोकशाही विरोधी प्रयत्न भाजपचे चालू आहेत. यासाठी भाजप कशाही प्रकारची तडजोड करण्यास तयार असून आता भाजप 'भ्रष्टाचार जुळवून घेणारी पार्टी' झाली आहे.' अशी टीका काँग्रेस प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी केले.

तिवारी म्हणाले, जनतेचा दुसरा पर्याय असलेल्या प्रतिपक्षांतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे व त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप बासनात गुंडाळून, त्यांना पायघड्या टाकुन पक्षांत घेण्याचा प्रघात भाजपने(BJP) पाडला आहे.



तसेच 'इतरवेळी भ्रष्टाचार, परिवारवादाच्या नावे गळा काढणाऱ्या भाजप नेत्यांना अशोक चव्हाणांची(Ashok Chavan) जनतेशी जुळलेली नाळ, जनाधार यांचा साक्षात्कार होतो व जेथून भाजप निवडून येऊ शकत नाही, तेथून चव्हाणांच्या मदतीने भाजपला विजयी होण्याची दिवास्वप्ने पडू लागतात, यावरून भाजपची अगतिकता व लाचारी स्पष्ट होते.' असं तिवारींन म्हटलं.

याशिवाय 'काँग्रेसने उभारलेल्या 'स्वातंत्र्योत्तर भारतात' संविधानिक, लोकशाही व न्यायालयीन व्यवस्थेमुळेच् 500 वर्षांपासुनच्या वादातीत 'रामजन्मभूमी'च्या जागेबाबत 'वादी-प्रतिवादींना' बाजू मांडण्याची संधी मिळाली, न्यायालयाचे दरवाजे खुले होऊन 'कायदेशीर न्याय-निवाडा' होऊन न्यायालयाने त्यावर निकालही दिला व राम मंदिरासोबत मशिद बांधण्याबाबतही निर्देश दिले. हे सर्व देशास स्वातंत्र्य मिळाल्यामुळेच झाले याचेही उचित स्मरण राम मंदिरांचे श्रेय घेऊ पाहणाऱ्या व स्वातंत्र्योत्तर भारतात सत्तेची फळे चाखणाऱ्या मात्र स्वातंत्र्य संग्रामात योगदान नसलेल्या भाजपने ठेवले पाहिजे.' अशा शब्दांत तिवारींनी टीका केली आहे.

काँग्रेसने उभारलेल्या स्वतंत्र लोकशाही देशात, भाजपने दाखवलेली स्वस्ताई व अच्छे दिनची स्वप्ने, बेरोजगारी, काळा पैसा, महागाई विरोधी दिलेली आश्वासने, शेतकऱ्यांच्या समस्या व पुर्वीच्या सरकारचा कथित भ्रष्टाचार या मुद्दयांवर निवडून दिले होते. मात्र, भाजप या निष्कर्षांवर चोखपणे काम करून स्वत:ला सिध्द करू शकली नाही, उलट देश तीनपट कर्जबाजारी झाला व दुप्पट महागाई झाली, राष्ट्रीय संपत्तीची 70 वर्षांत सर्वाधिक लुट झाली.' असंही तिवारी म्हणाले.

'सत्ता काळातील अपयशांची जाणीव झाल्यानेच भाजप नेते वाटेल त्या थराला जात असून विरोधी पक्षांचे नेते पळवण्याचे व अस्तित्व कमी करण्याचे अनैतिक प्रयत्न करू लागले आहेत.ट अशी टीका गोपाळ तिवारी यांनी केली.