Sangli Samachar

The Janshakti News

मुलींनो तुम्ही फक्त शिकत राहा, सरकार फी भरायला खंबीर आहे - चंद्रकांत पाटील

 


सांगली समाचार  - दि. २५|०२|२०२४

सोलापूर  - शिक्षण आपल्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. शिक्षण माणसाला समृद्ध करतं. पण कधी-कधी परिस्थितीमुळे शिक्षण अर्धवट राहातं. विशेषत: ग्रामीण भागातील मुलींबाबत हे अनेकदा घडताना दिसतं. मात्र आता पैशांच्या अभावामुळे मुलींना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागणार नाही. कारण सरकार आता मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार आहे. महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठी घोषणा केली आहे. सोलापूरमध्ये बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुलींच्या शैक्षणिक फीबाबत मोठी घोषणा केली आहे.

सरकार मुलींच्या शिक्षणाचा खर्च उचलणार

1 जून पासून महाराष्ट्रातील ओबीसी आणि व्हिजेएनटी तसेच अल्प उत्पन्न गटातील विद्यार्थिनींची मुलींची 100 टक्के फी राज्य सरकार भरणार आहे. महाराष्ट्रातील सर्व मुलींना फी नसल्यामुळे शिकता येत नाही, असं होणार नाही. मुलींच्या फी साठी आम्ही 1 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार आहोत. महाराष्ट्र सरकारच्या उपसमितीमध्ये याबाबतचा निर्णय झाला असून लवकरच याचा जीआर निघणार आहे, अशी घोषणा चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात बोलताना केली आहे.

होस्टेलच्या खर्चाबाबत चंद्रकांत पाटील काय म्हणाले ?

शैक्षणिक फी बरोबरच ज्या मुला-मुलींना होस्टेल मिळालेले नाही. अशांना निर्वाह भत्त्याची तरतूद करण्यात आली आहे. मेट्रो सिटीमधील विद्यार्थी-विद्यार्थीनीना दरमहा 6 हजार दिले जाणार आहेत. त्यापेक्षा छोट्या शहरांमध्ये 5300 तर तालुकास्तरावरील विद्यार्थ्यांना 3800 रुपये प्रति महिना निर्वाह भत्ता मिळणार आहेत. या निर्णयामुळे शिक्षणाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल अशी आशा आहे. विद्यार्थिनींना हा भत्ता थेट डिबीटीद्वारे विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

“…तेव्हा मोदींना बोलावणार”

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम उच्चस्तर शिक्षा अभियानाच्या माध्यमातून देशातील विद्यापीठांना 3 हजार 800 कोटी रुपये निधी दिला आहे. तर महाविद्यालयांना 5 हजार कोटी रुपये जाहीर होणार आहे. त्यानंतर नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील. तेव्हा ज्या विद्यापीठामध्ये 100 कोटींपेक्षा अधिकचा निधी वापरला जाईल. त्या ठिकाणी मोदीजींना आम्ही बोलवणार आहोत, असं चंद्रकांत पाटील म्हणालेत.

गारमेंट्स मोर्चाबद्दल  चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

सोलापुरातील गारमेंट्स मोर्चावरही चंद्रकांत पाटील यांनी भाष्य केलं. सोलापुरातील गारमेंट्स उद्योगाला विद्यार्थ्यांच्या गणवेशाचे मोठे काम वर्षानुवर्षे मिळत होते.मात्र राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्राचे एकच टेंडर काढण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र मी आणि आमदार सुभाष देशमुख तसेच विजयकुमार देशमुख एकत्रित मिळून मुख्यमंत्री आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार आहोत. यापूर्वी देखील असाच निर्णय झाला होता. मात्र त्यावेळी आम्ही तो निर्णय बदलून घेतला होता. यंदाही तसाच निर्णय होईल, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.