yuva MAharashtra “पापाची हंडी फोडली, आता विकासाचं लोणी जनतेपर्यंत” – मुख्यमंत्री फडणवीसांचा सूचक इशारा

“पापाची हंडी फोडली, आता विकासाचं लोणी जनतेपर्यंत” – मुख्यमंत्री फडणवीसांचा सूचक इशारा

| सांगली समाचार वृत्त |
सांगली - रविवार दि. १७ ऑगस्ट २०२५

राज्यात दहीहंडीच्या जल्लोषाने वातावरण भारले असून मुंबईसह सर्वत्र गोविंदांच्या हाकांनी रंगत वाढवली आहे. या उत्सवात राजकीय रंगही चढताना दिसत आहे. वरळीतील जांबोरी मैदानावर आयोजित परिवर्तन दहीहंडी सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहिले आणि यावेळी त्यांनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात नवे चर्चाविषय निर्माण केले.

दहीहंडी मंडळांचे कौतुक

फडणवीस यांनी विविध मंडळांचं अभिनंदन करताना शुभेच्छा दिल्या. एका मंडळाने ‘छावा’ चित्रपटातील दृश्याची रंगीत उभारणी केली होती, त्याचं त्यांनी खास कौतुकही केलं.

“मुंबई महापालिकेत परिवर्तन ठरलेलं”

मुख्यमंत्री म्हणाले, “महानगरपालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी आम्ही आधीच फोडली आहे. आता त्या ठिकाणी विकासाची हंडी लावली जाईल. त्या हंडीतील लोणी फक्त मोजक्या लोकांपुरतं न राहता, प्रत्येक सामान्य मुंबईकरापर्यंत पोहोचेल, हा आमचा संकल्प आहे.”

“लोणी कुणी खाल्लं, जनतेला ठाऊक आहे”

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी प्रत्युत्तर दिलं, “लोणी इतकी वर्षं कुठे जात होतं, हे लोकांना नीट माहिती आहे. तुम्ही फक्त माझ्या तोंडून ते ऐकण्याचा प्रयत्न करत आहात. मात्र जनतेला खरा हिशेब कळलाय.”

“शिंदे-फडणवीस सरकारमुळे सण मोकळेपणाने”

यापूर्वी दहीहंडी व गणेशोत्सवावर अनेक बंधने होती, पण शिंदे-फडणवीस सरकारने ती हटवल्यामुळे आज राज्यात सण उत्साह, ऊर्जा आणि मुक्त वातावरणात साजरे होत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

या सूचक विधानातून मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंबई महापालिकेतील आगामी राजकारणाला थेट लक्ष्य केल्याचे स्पष्ट झाले असून, त्यांच्या “लोण्याच्या” भाष्यामुळे राजकीय चर्चांना चांगलाच उधाण आलं आहे.