| सांगली समाचार वृत्त |
बंगळूरु - मंगळवार दि. १० जून २०२५
आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात पंजाब किंग्जवर दणदणीत विजय मिळवत १८ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाने जेतेपद पटकावले. विजयाच्या पार्श्वभूमीवर ४ जून रोजी आयोजीत करण्यात आलेल्या विजयोत्सवात एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर मोठी गर्दी झाली. या गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली आणि त्यात ११ नागरिकांचा मृत्यू तर ७५ हून अधिक जण जखमी झाले.
या दुर्दैवी घटनेनंतर आरसीबीसह चार संस्थांवर एफआयआर दाखल करण्यात आला. आरसीबीचे मालक 'रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड' (RCSL) यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी थेट कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
"आम्ही जबाबदार नाही" – आरसीबीचा युक्तिवाद
आरसीएसएलने दाखल केलेल्या याचिकेत सांगितले आहे की, सोशल मीडियावर त्यांनी स्पष्ट सूचना दिल्या होत्या की फक्त अधिकृत नोंदणी केलेल्यांनाच स्टेडियममध्ये प्रवेश दिला जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण जबाबदारी त्यांच्या संस्थेवर लादणे अन्यायकारक आहे, असा युक्तिवाद त्यांनी केला. या कार्यक्रमाचे व्यवस्थापन करणाऱ्या ‘डीएनए एंटरटेनमेंट नेटवर्क’नेही एफआयआर रद्द करण्यासाठी स्वतंत्र याचिका दाखल केली आहे.
राज्य सरकारशी सल्लामसलत करूनच निर्णय
आरसीबीने याचिकेत नमूद केले आहे की विजय परेड आयोजनाचा निर्णय कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (KSCA), डीएनए नेटवर्क आणि स्थानिक पोलिसांच्या सल्ल्यानंतरच घेण्यात आला होता. कार्यक्रमाच्या दिवशी म्हणजेच ४ जून रोजीच पोलिसांनी विजय परेड रद्द करण्याचे सूचित केले होते, मात्र मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी संघाच्या सत्कारासाठी स्वतंत्र योजना आखल्याचे त्यावेळी सांगण्यात आले होते.
मुख्यमंत्र्यांच्या ट्विटवरून सवाल
आरसीबीच्या वकिलांनी दावा केला की, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी स्वतः ट्विटरवरून जनतेला कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते, ज्यामुळे प्रचंड गर्दी उसळली. स्टेडियमबाहेर गोंधळ सुरू असतानाच आरसीबीला चेंगराचेंगरीची माहिती मिळाली.
केएससीएचे पदाधिकाऱ्यांचा राजीनामा
या घटनेनंतर दोन दिवसांनी कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशनमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत राजीनामे सादर केले. त्यांनी सांगितले की, प्रत्यक्षात आमची भूमिका मर्यादित असली तरी आम्ही नैतिकदृष्ट्या जबाबदार आहोत.