yuva MAharashtra सांगली जिल्ह्यात १०४ गावांवर महापुराचे संभाव्य सावट; प्रशासन सज्ज

सांगली जिल्ह्यात १०४ गावांवर महापुराचे संभाव्य सावट; प्रशासन सज्ज


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. १ जून २०२५

यंदा उन्हाळ्याच्या मध्यातच पावसाने हजेरी लावल्यामुळे सांगली जिल्ह्यातील १०४ गावांमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर संभाव्य आपत्तीला सामोरे जाण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

जलसंपदा, महसूल आणि आरोग्य विभागांनी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या असून, पूरग्रस्त गावांमध्ये निवारागृहांची आखणी, शासकीय शाळा आणि इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट, तसेच साथीच्या रोगांचे सर्वेक्षण यावर भर दिला जात आहे. पुराच्या वेळी नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर लवकर व सुरळीत होण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे.

गेल्या सहा वर्षांत दोन वेळा आलेल्या महापुरांमुळे मोठ्या प्रमाणावर शेती, घरे आणि जनावरांचे नुकसान झाले होते. त्यामुळे यंदा हवामान खात्याने १००% पावसाचा अंदाज दिल्यामुळे धोका लक्षात घेऊन प्रशासन सतर्क आहे. या १०४ गावांसाठी विशेष पूर आराखडे तयार करण्यात आले आहेत.

पशुधन आणि आरोग्यविषयक उपाययोजना

पूरस्थितीत जनावरांच्या सुरक्षिततेसाठी पशुसंवर्धन विभाग आवश्यक माहिती संकलित करत असून, त्यांच्या खाण्याचा चारा पुरवठ्याचे नियोजन कृषी विभागाच्या माध्यमातून केले जात आहे. चारा उत्पादक भागांची यादी तयार केली जात आहे.

आरोग्याच्या दृष्टीने, वाळवा प्राथमिक आरोग्य केंद्राने पूरधोका असलेल्या गावांमध्ये डेंग्यूचा सर्वे सुरू केला आहे. एकूण १९ प्राथमिक आरोग्य केंद्रे पूरधोका असलेल्या गावांमध्ये कार्यरत असून, सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.


आपत्ती व्यवस्थापनाची पूर्वतयारी

आपत्ती व्यवस्थापनासाठी वापरल्या जाणाऱ्या साहित्याची तांत्रिक तपासणी सुरू असून, आवश्यक दुरुस्तीही केली जात आहे. पूरग्रस्त भागांत बोट, बॅरिकेटिंग, रिफ्लेक्टर्स व अन्य सुरक्षा साधनांची तयारी केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्यांच्या ऑडिटची प्रक्रिया सुरु आहे.

पिण्याचे पाणी आणि वीजपुरवठा

पूरपरिस्थितीत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पर्यायी व्यवस्था ठरवली जात आहे. काही गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन आहे. ग्रामपंचायती व जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागांमध्ये समन्वय साधून यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. तलावांची तपासणी करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.

वीजपुरवठा खंडित होऊ नये म्हणून महावितरण विभागाने तातडीने दुरुस्ती पथके तयार ठेवण्यास सांगितले आहे. पूरस्थितीत वीज सेवा सुरळीत राहील, यासाठी नियोजन सुरु आहे.

कायदा आणि सुव्यवस्था

पूरपरिस्थितीत शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्ताचे नियोजन जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर करण्यात येत आहे. पूरग्रस्तांना मिळणाऱ्या मदतीचे योग्य व्यवस्थापन व्हावे यासाठी अधिकारी नियुक्त केले जाणार आहेत.