yuva MAharashtra रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा; 'माझा गड – माझी जबाबदारी'चा संदेश देत शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा; 'माझा गड – माझी जबाबदारी'चा संदेश देत शिवभक्तांचा उत्स्फूर्त सहभाग


| सांगली समाचार वृत्त |
सांगली - बुधवार दि. ४ जून २०२५

रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा पारंपरिक आणि ऐतिहासिक सोहळा जल्लोषात साजरा होत आहे. यंदा "माझा गड – माझी जबाबदारी" या संदेशासह हा उत्सव शिवभक्तांच्या साक्षीने भव्य स्वरूपात होत आहे. संभाजीराजे छत्रपती यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा संपन्न होत असून, सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी पाच ठिकाणी मोफत अन्नछत्र आणि निवास व्यवस्थेची सुविधा पुरवण्यात आली आहे.

सांगली जिल्ह्यातूनही सुमारे दहा हजारांहून अधिक शिवप्रेमी रायगडावर दाखल होत असून, घराघरांत शिवराज्याभिषेक साजरा व्हावा, असे आवाहन संयोजन समितीचे डॉ. संजय पाटील आणि ‘मराठा समाज’चे माजी अध्यक्ष अभिजित पाटील यांनी केले आहे.

पाचाड येथे जिजाऊंच्या समाधीला अभिवादनाने सोहळ्याची सुरुवात होणार असून, ५ जून रोजी पाचाड येथे जिजाऊ माता समाधीला अभिवादन करून या सोहळ्याची सुरुवात होईल. राज्यभरातून आलेल्या विविध जाती-धर्मांतील नागरिकांच्या सहभागामुळे हा सोहळा खऱ्या अर्थाने ‘लोकोत्सव’ ठरणार आहे.

गडावरील नियोजनासाठी आरोग्य, वाहतूक, नियंत्रण कक्ष, शिवभक्त व्यवस्थापन, गड सजावट, स्वच्छता, पाणी, वीज, मंडप, एलईडी व्यवस्था आदी चाळीस उपसमित्या कार्यरत आहेत. प्लास्टिकमुक्त गड उपक्रमांतर्गत, धातूच्या बाटल्यांचा वापर करून प्लास्टिकला संपूर्णतः फाटा देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



शौर्यभक्तीचा जागर आणि युद्धकलेचे दर्शन

गुरुवारी 'शौर्यभक्तीचा जागर' या विशेष कार्यक्रमांतर्गत ‘धार तलवारीची – युद्धकला महाराष्ट्राची’ या उपक्रमात ३५० मुला-मुली ‘पट्टा शस्त्राला मानवंदना देणार आहेत. राज्य शासनाने पट्टा शस्त्राला ‘राज्यशस्त्र’ म्हणून जाहीर केल्याच्या निमित्ताने, ‘होळीच्या माळावर’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी राज्यभरातील ३० आखाड्यांची नोंदणी झाली आहे.

परंपरा आणि लोककलांचा संगम

गडावर शंखनाद, तुतारी, दुर्गामाता नृत्य, हलगी, गजनृत्य, लेझीम, लोककलांचे सादरीकरण करण्यात येत असून ढोलपथकांच्या गजरात संपूर्ण गड दुमदुमून गेला आहे. ‘राजसदरे’वर राज्यभरातील शाहीर पोवाडे सादर करत आहेत. गडदेवता शिरकाईदेवीचा पारंपरिक गोंधळ देखील रंगणार आहे.

सोहळ्यात सहभागी होण्यासाठी ‘छावा’ संघटनेचे नितीन शिंदे यांनी नागरिकांना नावनोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. कार्यक्रमानंतर होणारी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी टप्प्याटप्प्याने गड उतरण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.