yuva MAharashtra राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी पदमुक्त करण्याची केली मागणी, सर्वत्र एकच चर्चा

राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी पदमुक्त करण्याची केली मागणी, सर्वत्र एकच चर्चा

फोटो सौजन्य : Wikimedia commons 

| सांगली समाचार वृत्त |
पुणे - मंगळवार दि. १० जून २०२५ 

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या वर्धापन दिन सोहळ्यात एक मोठी राजकीय हलकल्लोळ निर्माण करणारी घटना घडली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यासपीठावरून थेट शरद पवार यांच्याकडे विनंती केली की, "मला प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून मुक्त करावे." त्यांच्या या थेट आणि भावनिक आवाहनामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

जयंत पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, गेली सात वर्षे पक्षाने मला मोठी संधी दिली. मात्र, आता नव्या नेतृत्वाला संधी दिली पाहिजे. “ही लढाई आता पुढच्या पिढीकडे सुपूर्त करायची वेळ आली आहे,” असे त्यांनी सांगताना शरद पवार यांच्यावर अंतिम निर्णयाची जबाबदारी सोपवली. त्यांच्या या वक्तव्याने पक्षात अंतर्गत बदलांची चाहूल लागली आहे.

पाटील बोलत असतानाच सभागृहात काहीसा गोंधळ निर्माण झाला आणि त्यामुळे त्यांचे भाषण पूर्ण होण्याआधीच थांबावे लागले. आपल्या सुरुवातीच्या भाषणात पाटील यांनी महाराष्ट्रातील अनेक थोर व्यक्तिमत्वांचा उल्लेख करत आपली प्रेरणा स्पष्ट केली. “छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण – या सर्वांच्या विचारांनी प्रेरित होऊन मी ही जबाबदारी पार पाडली,” असं ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले, “2018 च्या शेवटी पक्ष कठीण परिस्थितीतून जात होता. अनेकजण पक्ष सोडून गेले होते. पण मी कायम पक्षाशी निष्ठा ठेवली. आमची लढाई केवळ राजकीय प्रतिस्पर्ध्यांशी नव्हती, तर इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी आणि निवडणूक आयोगासारख्या दबाव यंत्रणांशीसुद्धा होती.”


2019 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांबाबत सांगताना त्यांनी म्हटलं की, “पुलवामा हल्ल्यानंतर देशभर भावनिक वातावरण होतं. त्याचा फटका आमच्या पक्षालाही बसला. तरीही आम्ही तग धरला. शरद पवार यांच्यावर जेव्हा ईडीची नोटीस आली, तेव्हा जनतेने रस्त्यावर येऊन त्यांना साथ दिली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत आम्हाला ५३ जागांवर यश मिळालं.”

या संपूर्ण भाषणातून जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकाळाचा लेखाजोखा मांडत, पक्षासाठी केलेल्या योगदानावर प्रकाश टाकला आणि भविष्यातील नेतृत्वाला मार्ग मोकळा करून देण्याची आपली तयारी व्यक्त केली.