| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० मे २०२५
पंढरपूरची पवित्र 'आषाढी वारी' ही महाराष्ट्राची आध्यात्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपणारी महत्त्वाची परंपरा आहे. यंदा पावसाचे आगमन लवकर झाले असल्याने वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व मानाच्या पालख्यांसाठी आवश्यक सुविधा पुरवण्याचे योग्य नियोजन सर्व विभागांनी संयुक्तपणे करावे, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या आषाढी वारी पूर्वतयारीच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार अभिजित पाटील, मुख्य सचिव सुजाता सौनिक तसेच विविध खात्यांचे वरिष्ठ अधिकारी व मानाच्या दिंड्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, वारीच्या नियोजनासाठी राज्य शासन संपूर्ण ताकदीने कार्यरत आहे. राज्यातील विविध भागांतून येणाऱ्या पालख्यांना मार्गातील जिल्ह्यांमध्ये सुविधा मिळाव्यात यासाठी नाशिक, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर विभागीय आयुक्तांनी समन्वयाने बैठक घ्यावी, असे निर्देशही त्यांनी दिले. स्थानिक प्रशासनाने देखील रस्ते, पाणी, आरोग्य सेवा आणि पोलिस बंदोबस्ताच्या अनुषंगाने तत्काळ नियोजन करावे.
पोलीस बंदोबस्त अधिक चोख असावा यासाठी, प्रत्येक जिल्ह्याच्या हद्दीवर पोलीस आधीच तैनात राहून पालखी कुठेही पोलिसांविना प्रवास करत नाही याची काळजी घेण्याचे आदेशही देण्यात आले.
वारीदरम्यान वाखरी येथे मानाच्या सर्व पालख्यांचा एकत्रित थांबा असतो. नामदेव महाराजांच्या ओट्याजवळ प्रचंड गर्दी होत असल्याने सोलापूर प्रशासनाने गर्दी नियंत्रणाचे योग्य नियोजन करावे, तसेच वाखरी येथे बारकरी तळाचा आराखडा तयार करण्यात यावा, असे मुख्यमंत्री म्हणाले.
सुमारे १५ ते २० लाख भाविक वारीत सहभागी होतात. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने 'विठ्ठल रखुमाई बारकरी विमा छत्र योजना' यावर्षीही लागू राहणार आहे. मानाच्या पालख्यांतील भाविकांसाठी दर्शन पासची संख्या वाढविण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.
पावसाचा अंदाज लक्षात घेता, पालखी मुक्कामाच्या ठिकाणी ३६ वॉटरप्रूफ मंडपांची तयारी करण्यात आली आहे आणि आवश्यकतेनुसार त्यात वाढही करण्यात येणार आहे. महिलांच्या गरजांचा विचार करत विशेष ‘हिरकणी कक्ष’ व स्वतंत्र स्नानगृहांची सोय केली जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली